
मुंबई (Mumbai) : वसई-विरार (Vasai-Virar) शहराच्या पाणी पुरवठ्यात महत्त्वपूर्ण खोलसापाडाच्या टप्पा-१ साठी आवश्यक ३४८ एकर वनजमीन देण्यास केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्याने राज्याच्या वन विभागानेही नुकतीच ती वळती करण्यास अंतिम मंजुरी दिली. यामुळे वसई-विरार महापालिकेच्या धरणाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
भविष्यात एमएमआरडीएच्या विकास आराखड्यानुसार वसई-विरारची लोकसंख्या पुढील २० वर्षांत ४५ लाख होणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येसाठी महापालिकेने विविध योजनांवर काम सुरू केले आहे. यात खोलसापाडा धरणाच्या टप्पा क्रमांक १ आणि टप्पा क्रमांक २ चे काम प्रस्तावित केले आहे. यासाठी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात २३१ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद केली आहे. खोलसापाडा टप्पा क्रमांक १ आणि टप्पा क्रमांक २ या स्वतंत्र योजना आहेत. त्यातून ७० दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे.
वसई विरार शहराची लोकसंख्या सुमारे २२ लाख आहे. या लोकसंख्येला ३५० एमएलडी इतक्या पाण्याची गरज आहे. सध्या शहराला २३० एमएलडी इतका पाणीपुरवठा होत आहे. सूर्या धरणातून १८५, उसगाव धरणातून २०, पेल्हार धरणातून १४ आणि फुलपाडा पाणी योजनेतून दीड एमएलडी पाणीपुरवठा होतो. शिवाय महापालिकेला खोलसापाडा-१ व खोलसापाडा-२ धरण योजनेतून ७० एमएलडी पाण्याची प्रतीक्षा आहे. याच खोलसापाडाच्या टप्पा १ साठी आवश्यक असलेल्या १३९.४७३ हेक्टर अर्थात ३४८.६८ एकर वनजमीन देण्यास केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्याने राज्याच्या वन विभागानेही ती वळती करण्यास अंतिम मंजुरी दिली. यामुळे या धरणाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
सरकारने नुकतीच १३९.४७३ हेक्टर वनजमीन वळती करण्यास मंजुरी दिली आहे, त्या राखीव वन ९९.८०१ हेक्टर, तर वूडलँड संरक्षित वन जमीन ३९.६७२ हेक्टर आहे. भारत सरकारच्या वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अटी व शर्तीनुसार या वनांवर धरण उभारावयाचे आहे. यात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होणार असून, सात गावच्या हद्दीतील अनेक आदिवासी पाडेही बाधित होणार आहेत.
कोणत्या गावांतील जमीन जाणार?
गावाचे नाव- राखीव वन- संरक्षित वन
कंरजोन-९७.४६१ हेक्टर- ७.४० हेक्टर
तिल्हेर - ०००- ८.५७७ हेक्टर
दीपिवली-०००- ३.८२५हेक्टर
पारोळ- २.३४० हेक्टर-४.५९१ हेक्टर
उसगाव- ०००-९.३८३ हेक्टर
शिवनसाई-०००-४.५२३ हेक्टर
चांदीप-०००-१.३७३ हेक्टर
एकूण-९९.८०१ हेक्टर - ३९.६७२ हेक्टर