Nagpur : टेंडर काढले आणि वर्कऑर्डरही झाली तरीही कामे का रखडली?
नागपूर (Nagpur) : नागपूर सुधार प्रन्यासने वैशाली नगर घाटालगतच्या जागेवर इदगाहला सुरक्षा भिंत आणि ग्रीन जीम बांधण्याचे टेंडर काढले. वर्कऑर्डर देऊन कामाला सुरुवात केली. मात्र ही जागा महापालिकेने आपल्या मालकीची असल्याचा दावा केल्याने विकासकामे रखडली आहेत.
या विकासकामासाठी महापालिकेचे नाहरकत पत्र का घेतले नाही, अशी विचारणा नासुप्रला केली आहे. दुसरीकडे ही जमीन आपल्याच मालकीची असल्याचा दावा एनआयटीने केला आहे. यासाठी मनपाच्या परवानगीची गरज नव्हती. गेल्या अनेक महिन्यांपासून येथील कामे रखडली आहेत. कार्यादेश असतानाही विकासकामे मनपाकडून थांबविण्यामागे राजकीय खेळी असल्याचा दावा केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार डॉ. नितीन राऊत यांनी ने इदगाहची सुरक्षा भिंत व ग्रीन जिमचा प्रस्ताव यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध केला. एनआयटीने निविदा काढून कार्यादेश दिले. मात्र याच दरम्यान महापालिकेच्या आसीनगर झोनच्या सहायक आयुक्तांनी पत्र देऊन काम बंद पाडले. ही जागा मनपाची असून, हॉकर्स झोनसाठी आरक्षित असल्याचा दावा केला. दुसरीकडे एनआयटीने महापालिकेला पत्र लिहून ही जागा त्यांचीच असल्याचे स्पष्ट केले. जागेच्या मालकीवरून एनआयटी व मनपा यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू असून काम थांबले आहे. वैशाली नगर घाटलगतची जमीन एनआयटी ची आहे, यासंदर्भात महापालिकेकडे आवश्यक पत्रव्यवहारही केला आहे. निविदा काढल्यानंतर कार्यादेश देऊन काम सुरु करण्यात आले. मात्र मनपाचे पत्र आल्यानंतर काम बंद करण्यात आले आहे. 1 कोटी 27 लाख रुपये खर्चाची विकासकामे करण्यात येणार आहे.