अमरावती (Amravati) : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्वात मोठ्या चांदी सिंचन प्रकल्पातून आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला शेतीकरिता पाणी मिळाले नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून निर्माण झालेल्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
2012 मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. कालवा सन 2015 मध्ये पूर्ण झाला. प्रकल्पासाठी परिसरातील वडाळा, फत्तेपूर आणि महिमापूर या गावांचे पुनर्वसन करण्यात आले होते. या प्रकल्पाची 1835 हेक्टर सिंचन क्षमता आहे. अनेक शेतकऱ्याच्या जमिनी प्रकल्पामध्ये गेल्या. प्रकल्पापासून ते मंगरूळ असा 16 किलोमीटरचा कालवा तयार केला. कालव्यालगत मुंडवाडा, गौरखेडा, रोहणा, जावरा, पहूर, कणी, वेणी गावे येतात. या गावातील शेतकऱ्यांना धरणाचे पाणी शेतीसाठी मिळायला पाहिजे होते. परंतु, कालवा आणि पाटचऱ्याचे काम पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही.
सात वर्षांचा अवधी लोटला तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी नेण्यात जलसंपदा विभाग अपयशी ठरला. मागील मे महिन्यात संपूर्ण कालवा साफ करण्यासाठी सात लाख रुपये खर्च केले होते. परंतु, आजरोजी कालवा आहे की शेत, हे समजायला मार्ग नाही. मुख्य कालव्यामधून शेतात पाणी जाण्यासाठी सिमेंटचे बॉक्स तयार करण्यात आले. परंतु, पाटचऱ्याचे काम पूर्ण झालेले नाही. या संबंधित जलसंपदा विभाग, अमरावतीचे कनिष्ठ अभियंता अंकुश बागडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कॅनलचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच काम पूर्ण करण्यात येईल.