
नागपूर (Nagpur) : राज्यात महायुतीने सरकार सत्तेत आले आहे. नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर येथे झाला. आता या मंत्र्यांना कोणते खाते मिळणार याची उत्सुकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी येत्या दोन दिवसात खातेवाटप जाहीर केले जाईल, असे स्पष्ट केले.
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी रविवारी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा झाला.
यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे - पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक ऊईके, शंभुराज देसाई, अॅड. आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंह भोसले, अॅड. माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय सिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद जाधव पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबीटकर यांचा समावेश आहे.
सोबतच 6 सदस्यांना राज्यपालांनी राज्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यात माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर - साकोरे, इंद्रनील नाईक, योगेश कदम यांचा समावेश आहे. नव्या सरकारमध्ये वजनदार खाते मिळावे यासाठी संबंधितांची मोर्चेबांधणी सुरू आहे.
शपथविधी समारंभास मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती होती. समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती.