

नाशिक (Nashik): 'पुण्याहून पुणतांबे गाठू नका' या मराठी म्हणीमध्ये बदल करण्याची वेळ आता रेल्वे मंत्रालयाने आणली आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असणार मात्र अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Pune Nashik Highspeed Railway Project News)
एखादी गोष्ट थेट न करता आड वळणाने अनावश्यकपणे सांगण्याला अथवा करण्याला मराठी भाषेत पुण्याहून पुणतांबे गाठू नका, असे म्हटले जाते. रेल्वे मंत्रालयाने आता नाशिक-संगमनेर-नारायणगाव असा नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग बदलून तो नाशिक-शिर्डी-पुणतांबे-अहिल्यानगर-पुणे असा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नाशिक-पुणे या बदललेल्या रेल्वेमार्गामुळे या म्हणीमध्ये बदल करून 'पुणतांबेहून पुणे गाठणे', असे म्हणावे लागणार आहे.
नाशिक-पुणे रेल्वेमार्गात बदल केल्यामुळे सिन्नर तालुक्यात यापूर्वी केलेले ४५ हेक्टरचे भूसंपादनही वाया जाणार आहे. आपल्या भूसंपादित केलेल्या जमिनींचे काय होणार? सरकार या जमिनी परत करणार का, सरकारने दिलेल्या मोबदल्याचे काय, असे प्रश्न या जमीन मालकांना पडले आहेत.
राज्यातील प्रमुख शहरांपैकी असलेल्या नाशिक आणि पुणे यांना सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाने जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार नाशिक-पुणे रेल्वेसाठी नाशिक- सिन्नर- संगमनेर- नारायणगाव- चाकण- पुणे असा असून, २३५ किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित केला होता.
रेल्वे मंत्रालयाने तांत्रिक बाबींचा व व्यवहार्यतेचा मुद्दा पुढे करीत हा मार्ग नाशिक- शिर्डी- पुणतांबे- अहिल्यानगर- चाकण- पुणे असा केला आहे. हा रेल्वेमार्ग बदलल्याने आता तो शिर्डीहून जाणार आहे. या रेल्वामार्गामुळे शिर्डी व नाशिक येथे येणाऱ्या दक्षिण भारतातील पर्यटकांची सोय बघितली आहे. मात्र, नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय केली असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.
नाशिक-पुणे हा रेल्वेमार्ग महारेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी नाशिक, नगर व पुणे या जिल्ह्यांमध्ये भूसंपादनही करण्यात आले. नाशिक जिल्ह्याचा विचार करता त्या प्रस्तावित जुन्या मार्गासाठी जिल्ह्यातील नाशिक व सिन्नर या दोन तालुक्यात २२ गावांत भूसंपादन केले जाणार होते. त्यानुसार सिन्नरमधील ६६ हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे. संबंधित जमीन मालकांना त्याचा मोबदलाही दिला आहे.
आता सिन्नर शहरापर्यंत हा मार्ग कायम असला तरी तेथून तो वावीमार्गे शिर्डीला जाणार आहे. त्या मार्गाचे मध्यंतरी सर्वेक्षणही झाले आहे. यामुळे सिन्नर तालुक्यातील जवळपास ४६ हेक्टर भूसंपादन वाया जाणार असे दिसत आहे.
भूसंपादित जमिनींचे काय होणार?
या शेतकऱ्यांनी रेल्वेला जमीन देऊन त्या बदल्यात मोबदलाही घेतला आहे. आता तो रेल्वेमार्ग बदलला असल्याने या अधिग्रहित जमिनींचे काय होणार, असा या शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. या जमिनी मूळ मालकांच्या ताब्यात असल्या तरी त्यांच्या सात-बारा उताऱ्यावर सरकारचे नाव आहे.
आता सरकार या भूसंपादित जमिनीबाबत काय धोरण ठरवणार? संपादित जमिनी ताब्यात घेणार का? असे प्रश्न सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना सतावत आहेत. याच पद्धतीने संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यांमधील शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केलेल्या जमिनींचा प्रश्न निर्माण होणार आहे.