नाशिक (Nashik) : मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक ते मुंबई या रस्त्यांची त्वरित डागडुजी करावी. अन्यथा त्या मार्गावर टोल आकारू नये, असा इशारा नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) तर्फे निमा सभागृहात आयोजित उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी आदी संघटनांच्या बैठकीत देण्यात आला. मुंबई-नाशिक मार्गावरील भिवंडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला असताना या संपूर्ण मार्गावर खड्ड्यांचा प्रश्न तिव्र झाला आहे. यामुळे नाशिकमधील उद्योजकांनी रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत टोल आकारू नये, अशी भूमिका घेतली आहे.
नाशिक येथील उद्योजकांच्या बैठकीला निमा, आयमा, क्रेडाई, नाईस, निपम, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमस, लघु उद्योग भारती, तान, प्रॅक्टिशनर इंजिनिअर असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्योजकांच्या भावना तीव्र होत्या. आपण सर्व टोल भरतो, त्यातुलनेने रस्ते चांगले नसतील तर त्याचा उपयोग काय. मुंबईला जायला आठ तास लागत असतील तर ते आम्ही कसे खपवून घ्यायचे, असा संतप्त सवाल करून रस्त्यांची डागडुजी लवकर न झाल्यास शासनाने स्वतःहूनया मार्गांवरील टोल बंद करावे,असा एकमुखी निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
वंदे भारत आणि जनशताब्दीच्या धर्तीवर नाशिकहून मुंबईला तीन तासांत पोचवणारी जलदरेल्वे हवी, नाशिकहून मुंबईसाठी लोकल सेवेचे व्यापक जाळे विणले जावे, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित केलेल्या बाह्य रिंग रोडला त्वरित मंजुरी मिळावी, महापालिकेच्या बंद असलेल्या सर्व जकात नाक्यांजवळ ट्रक टर्मिनस उभारावे, ओझर विमानतळावरून सर्व ठिकाणी जाण्यास बस कनेक्टिव्हिटी हवी आदी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.