मुंबई-नाशिक रेल्वे प्रवासातील 'बँकर' इंजिनचे टेन्शन संपणार; काय आहे नवा प्लॅन?

१०,१५४ कोटींच्या कसारा-मनमाड रेल्वे मार्गिकेचे सर्वेक्षण सुरू; ४५ गावांत होणार भूसंपादन
Nashik Mumbai Railway Travel, kasara ghat
Nashik Mumbai Railway Travel, kasara ghatTendernama
Published on

नाशिक (Nashik): मुंबई-नाशिक रेल्वे प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरणारा कसारा घाट आता कायमचा सुसह्य होणार आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये मंजूर केलेल्या १० हजार १५४ कोटी रुपयांच्या कसारा-मनमाड तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेसाठी रेल्वे मंत्रालयाने प्रत्यक्ष सर्वेक्षण (Survey) सुरू केले आहे. १३१ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील ५ तालुक्यांमधील ४५ गावांतून सुमारे ३३४ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचे अंतर १० किलोमीटरने कमी होणार असून, २०३० पर्यंत नाशिक-मुंबई प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होईल.

Nashik Mumbai Railway Travel, kasara ghat
Nashik ZP: जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीस मिळणार 18 लाख भाडे

मध्य रेल्वेचा मुंबई ते भुसावळ हा मार्ग देशातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक मानला जातो. मात्र, कसारा घाटातील तीव्र चढणीमुळे या मार्गावर रेल्वे गाड्यांचा वेग मंदावतो आणि नवीन गाड्या सुरू करण्यावरही मर्यादा येतात. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कसारा ते मनमाड दरम्यान नवीन समांतर रेल्वे मार्ग उभारण्याची प्रक्रिया आता युद्धपातळीवर सुरू केली आहे.

घाटातील प्रवासाची व्याख्या बदलणार
सध्या मुंबईहून नाशिककडे येताना कसारा येथे रेल्वे गाड्यांना 'बँकर' (मागून ढकलणारे इंजिन) लावावे लागते. यामध्ये प्रवाशांचा १० ते १५ मिनिटांचा वेळ वाया जातो. प्रस्तावित नवीन मार्गिकेवर कसारा ते नांदगाव बुद्रुक (ता. इगतपुरी) दरम्यान तब्बल १८ बोगदे असणार आहेत. या आधुनिक अभियांत्रिकीमुळे घाटातील चढणीची उंची (ग्रेडीयंट) कमी होईल. परिणामी, विना-बँकर इंजिन रेल्वे गाड्या थेट घाट पार करू शकतील. यामुळे केवळ वेळेचीच बचत होणार नाही, तर तांत्रिक गुंतागुंतही कमी होईल.

Nashik Mumbai Railway Travel, kasara ghat
गुंतवणुकीचे 'नेक्स्ट डेस्टिनेशन' नाशिक! 750 कोटींचे वर्ल्ड ट्रेड सेंटर, 50 कोटींचे आदिवासी क्लस्टर

पाच तालुक्यांत ३३४ हेक्टरचे भूसंपादन
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जमिनीची मोजणी आणि संपादनाची तयारी सुरू झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, नाशिक, निफाड, चांदवड आणि नांदगाव या पाच तालुक्यांतील ४५ गावांतून सुमारे ३३४ हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. यामध्ये नाशिक तालुक्यातील १६, निफाडमधील १७, चांदवडमधील ७, इगतपुरीमधील ४ आणि नांदगावमधील एका गावाचा समावेश आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर भूसंपादनाचा रीतसर प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सोपवला जाईल.

२०३० पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष
कल्याण ते कसारा आणि मनमाड ते भुसावळ या टप्प्यांचे काम आधीच प्रगतीपथावर आहे. केवळ कसारा ते मनमाड हा मधला दुवा बाकी होता, ज्याला आता गती मिळाली आहे. हा प्रकल्प पुढील पाच वर्षांत म्हणजेच २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे मंत्रालयाने ठेवले आहे. नवीन मार्गिकेमुळे मुंबई-नाशिक दरम्यान धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवता येईल आणि मालवाहतुकीलाही मोठी गती मिळेल. नाशिकच्या औद्योगिक आणि नागरी विकासासाठी हा प्रकल्प 'गेमचेंजर' ठरणार आहे.

Nashik Mumbai Railway Travel, kasara ghat
Nashik Infra Boost: रेल्वेकडून नाशिक जिल्ह्याला काय मिळणार गुड न्यूज?

महत्वाचे मुद्दे

  • कसारा-मनमाड १३१ किमीच्या ३ऱ्या आणि ४थ्या रेल्वे लाईनचे सर्वेक्षण सुरू.

  • केंद्र सरकारकडून १०,१५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर.

  • प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ४५ गावांत भूसंपादन होणार.

  • १८ बोगद्यांमुळे कसारा घाटात बँकर इंजिनची गरज उरणार नाही.

  • मुंबई-नाशिक रेल्वे प्रवासाचे अंतर १० किलोमीटरने कमी होणार.

  • २०३० पर्यंत काम पूर्ण करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे उद्दिष्ट.

Tendernama
www.tendernama.com