
नाशिक (Nashik) : भुसावळ, नाशिकरोड, मनमाड, इगतपुरीचा समावेश असलेल्या मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वेमार्गाचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे. भुसावळ विभागातील विद्युतीकरणामुळे भुसावळ विभागाच्या वार्षिक इंधन बिलात ४०४ कोटींची बचत होत आहे. महत्त्वाचे म्हणजे वार्षिक १. २५ लाख टन कार्बन फूटप्रिंटची बचत होऊन प्रदूषण कमी झाले.
मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव, भुसावळ, धुळे, शेगाव आदी पंधरा रेल्वेस्थानकांमध्ये सोलर पॅनल बसवण्याचे काम सुरू असून, त्यातून विजनिर्मिती झाल्याने वीजबिलात मोठी बचत होणार असल्याची माहिती मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांनी दिली. तसेच भुसावळ विभागातील ३०८ किलोमीटर लांबीचा भुसावळ-इगतपुरी विभाग दुहेरीमार्गाचा असून हा मार्ग मुंबई परिसरातून आणि दक्षिणेकडील प्रदेशात अवजड वाहतुकीची मुख्य वाहिनी आहे.
मध्य रेल्वेच्या कामकाजात हा विभाग महत्त्वाचा आहे. केवळ मध्य रेल्वेचेच नव्हे, तर भारतीय रेल्वेचेही सुरळीत कामकाज या विभागाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या पहिल्या टप्प्यात २५ केव्ही. एसी प्रणालीसह विद्युतीकरणासाठी या विभागाची निवड करण्यात आली होती. या विभागातील विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे इंधनाच्या बिलात वर्षाला ४०४ कोटींची बचत झाली आहे. तसेच कार्बन फूटप्रिंटची १.२५ लाख टनाची बचत होऊन प्रदूषणात मोठी घट येणार आहे.
भारतीय रेल्वेच्या मध्यरेल्वे विभागातील भुसावळ विद्युतीकरण प्रकल्पास १९६४ मध्ये सुरुवात झाली आणि १९६९ मध्ये तो पूर्ण झाला. नंतर विभागातील भुसावळ-बडनेरा आणि भुसावळ-खांडवा विभागाचे अनुक्रमे १९९० आणि १९९२ मध्ये विद्युतीकरण करण्यात आले. या दोन विभागांनी अनुक्रमे बडनेरा आणि खंडवामार्गे मध्य भारताला उत्तर प्रदेशाशी जोडले. भुसावळ विभागाच्या ब्रॉडगेज मार्गावर ८०४ आरकेएम आणि २१०२ टीकेएमचे शंभर टक्के विद्युतीकरण साध्य करण्यासाठी चाळीसगाव-धुळे विभागाच्या शाखा लाईनचे २०१९मध्ये विद्युतीकरण झाले आहे.