
पुणे (Pune) : कोथरूडमधील (Kothrud) सुतारदरा परिसरातील राजमाता जिजाऊनगरमधील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
कोथरूडच्या म्हातोबा टेकडी व एआरएआय टेकडीच्या पायथ्याला असलेल्या उताराच्या भागात सुतारदरा वसलेला आहे. डोंगर फोडून जागा करून येथील डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात वसाहती व चाळी बांधण्यात आल्या आहेत. कष्टकरी कामगार वर्गाचे मोठे प्रमाण असलेल्या या भागाची लोकसंख्या २० हजारांहून अधिक आहे.
दाट लोकवस्तीचा भाग असल्याने येथे मोठी वाहने आतमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे दुचाकी, तीन चाकी वाहनांचा वापर येथे होतो. मोजक्या गल्ल्यांमध्ये छोटी चारचाकी वाहने येऊ शकतात. त्यामुळे येथील लोकांना पीएमपीची बस पकडण्यासाठीही दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते.
मल, जल आणि विजेच्या वाहिनीत बिघाड झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठीही मोठा आटापिटा करावा लागतो. त्यामुळे येथे कचरा संकलन करणेदेखील अवघड होते. यामुळेच येथील कचऱ्याची समस्या गंभीर होत आहे.
महापालिका व समाजसेवी संस्था यांच्या पुढाकारातून सुतारदरा भागात स्वच्छता व जनजागृती अभियान वेळोवेळी राबविण्यात येते. परंतु लोकांच्या मानसिकतेत फारसा बदल घडलेला नाही. स्थानिक कार्यकर्ते, अधिकारी व रहिवासी यांच्यात या समस्येवर मात करण्यासाठी जनसंवाद होण्याची आवश्यकता आहे. लोकांच्या सक्रिय सहभागातूनच येथील कचरा समस्या सुटेल.
उपाययोजना
प्लॅस्टिक बंदी अमलात आणावी
छापे टाकून कारवाई करावी
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई वाढवावी
रात्रपाळी व सकाळी लवकर कामाला जाणाऱ्यांना कचरा संकलकांकडे कचरा देण्याची वेळ जुळत नाही. त्यामुळे दिवसातून तीन वेळा कचरा संकलनाचे नियोजन करावे.
चारनळ परिसर येथे असलेल्या नाल्यात व येथून अष्टविनायक कॉलनीकडे जाणारा रस्ता, गोकूळ सभागृहाकडे जाणारा रस्ता, पाण्याच्या टाकीकडून किष्किंधानगरकडे जाणारा रस्ता येथे मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे. त्यामुळे शहरात प्लॅस्टिक बंदी आहे, यावर विश्वास बसणार नाही इतका प्लॅस्टिक कचरा या भागात दिसतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. येथील कचरा समस्येवर महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे.
- दीपाली डोख, महिला बचतगट सदस्य, सुतारदरा
या भागासाठी महापालिकेचे १२ कायम व ३४ कंत्राटी सफाई कामगार आहेत. याशिवाय स्वच्छच्यावतीने येथे कचरा संकलन केले जाते. मात्र येथील ६० टक्के हून अधिक लोक स्वच्छच्या कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून ५० रुपये देण्यासदेखील टाळाटाळ करतात. ही मंडळी कामाला जाताना सकाळी किंवा रात्री उशिरा डोंगराच्या कडेला किंवा रस्त्यावर कचरा टाकून देतात. त्याचा त्रास सर्वांना होतो.
- राम सोनवणे, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक