
पुणे (Pune) : पुणे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा दावा महापालिकेचे (PMC) अधिकारी करत असले, तरी प्रत्यक्षात विविध भागांत अपुरा पुरवठा होत असून, नागरिक मेटाकुटीला आले आहेत. पाणी कमी दाबाने येणे, उशिरा येऊन लवकर जाणे, यामुळे वेळापत्रकही कोलमडले आहे. त्यामुळे पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही पाणीटंचाईला का सामोरे जावे लागत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Water Shortage In Pune News)
शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. एरंडवणे, कर्वेनगर, डीपी रस्ता, पटवर्धन बाग, विधी महाविद्यालय रस्ता, पौड फाटा, भांडारकर रस्ता, जनवाडी, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, शिवाजीनगर, धायरी, धायरी फाटा, गुरुवार पेठ, रविवार पेठ यासह अन्य पेठांमध्ये पाणीपुरवठा कमी होत आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या; तरीही पुरवठा पूर्ववत झालेला नाही.
एरंडवणे, पटवर्धन बाग, नळ स्टॉप यासह अन्य भागांत पूर्वी पूर्ण दाबाने पुरवठा होत होता. परंतु, गेल्या आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपासून कमी दाबाने पुरवठा होत आहे, तसेच वेळेआधीच पाणी जात आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या टाक्या भरत नसल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आम्ही पूर्ण दाबाने पुरवठा करत आहोत, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे.
प्रत्यक्षात नागरिकांना कमी पाणी मिळत आहे. अशीच स्थिती सेनापती बापट रस्ता, वडारवाडी, जनवाडी, मॉडेल कॉलनी भागांतील आहे. धायरी, धायरी फाटा परिसरातही कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे तेथील सोसायट्यांना टँकर मागवावे लागत असून, दररोज हजारो रुपये टँकरवर खर्च करावे लागत आहेत.
मागणी वाढल्याने नियोजन आवश्यक
एकीकडे पाणीटंचाई निर्माण होत आहे, तर दुसरीकडे उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. ज्या भागात पाणीपुरवठा होतो, तेथे जास्त पाणी वापरले जात आहे. जलवाहिनीच्या सुरुवातीच्या भागात मुबलक पाणी उपलब्ध होत आहे, तर शेवटच्या आणि उंचावरील भागात पाणी पोहोचण्यास उशीर होत आहे. परिणामी त्या भागाला टंचाईचा सामना करावा लागत आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशी अवस्था असेल, तर जूनपर्यंत आणखी भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला योग्य नियोजन करून पुरवठा सुरू ठेवावा लागणार आहे.
कोथरूडमध्ये अपुरा आणि विस्कळित पाणीपुरवठा होत आहे. आठवडा उलटूनही त्याचे कारण प्रशासनाला सापडत नाही. नागरिकांच्या दररोज अनेक तक्रारी येत आहेत. या विरोधात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहे.
- संदीप खर्डेकर, प्रवक्ते, भाजप
उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे काही भागांत पाणी कमी दाबाने येणे, कमी वेळ येणे, अशा अडचणी येत आहेत. त्यावर पाणीपुरवठा विभाग लक्ष ठेवून आहे. पुरेसे पाणी देण्यासाठी नियोजन केले जात आहे.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका