
पुणे (Pune) : राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी म्हणून २०१७ साली शिवशाही बससेवा (Shivshahi Bus) सुरू केली. मात्र आठ वर्षांतच या बसची अवस्था दयनीय झाली आहे.
सध्या एसटीच्या ताफ्यात ७९२ 'शिवशाही' असून प्रत्यक्षात ५०० बसच रस्त्यावर धावत आहेत. बसमधील वातानुकूलित यंत्रणा कधी सुरू तर कधी बंद असते. सीट, पडद्यांवर धुळीचे साम्राज्य आहे. बसच्या बनावटीमध्येच तांत्रिक दोष असल्याने सर्वाधिक अपघात 'शिवशाही'चे झाले आहेत. त्यामुळे प्रवास केवळ गैरसोयीचा नाही तर असुरक्षित देखील बनतो.
राज्य परिवहन महामंडळात पूर्वी बसचे आयुर्मान आठ वर्षे झाल्यानंतर ती बस सेवेतून बाहेर काढली जात होती. मात्र आता बसची संख्या अत्यंत कमी असल्याने प्रशासनाने बसचे आयुर्मान आठ वरून १० वर्षे केले. आता तर ते १५ वर्षे ठरविण्यात आले आहे. परिणामी भंगारात जाण्यायोग्य असलेल्या बस या प्रवाशांना घेऊन वाहतूक करीत आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत असून अनेक अडचणींना तोंड देत प्रवास करावे लागत आहे.
बसमधील चालक व वाहकांना देखील शिवशाही बसचा फटका बसतो. वातानुकूलित यंत्रणा सुरू झाल्यावर गाडीचा वेग आपसूकच कमी होत असल्याने चालकांवर ताण येत असल्याचे काही चालकांनी नाव न प्रसिद्ध छापण्याच्या अटीवर सांगितले.
शिवशाही बसचे आयुर्मान पूर्ण झाले आहे. 'शिवशाही'च्या प्रत्येक बसने किमान आठ ते नऊ लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. या बस आता भंगारात जाणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासनाकडून थातुरमातूर देखभाल व दुरुस्ती करून त्या पुन्हा प्रवासी सेवेत सोडल्या जातात. परिणामी या बस वाटेतच बंद पडत आहेत. बस बंद पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवाशांना तासनतास दुसऱ्या बसची वाट पाहत थांबावे लागते.
खुर्च्यांची स्थिती बिकट, एसीमध्ये कागद
शिवशाही बसमध्ये सीटची रचना ही दोन - दोन अशी आहे. मात्र अनेक बसमधील खुर्च्या तुटलेल्या आहेत तर काही बसमध्ये सीटचे कापड फाटलेले आहे. स्वच्छता तर कुठेही दिसत नाही. झुरळांचा मुक्त वावर असल्याच्या तक्रारी देखील प्रवासी करतात. उन्हाळ्यात वातानुकूलित बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवासी शिवशाही बसला प्राधान्य देतात. मात्र अनेकदा वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झालेला असतो तर काही बसमध्ये यंत्रणेच्या युनिटमध्ये कागद कोंबल्याचे प्रकार घडत आहेत.
मी अनेकदा एसटीने प्रवास करतो. शिवशाही बसने प्रवास करण्याचा अनुभव मात्र संतापजनक आहे. बसची अवस्था दयनीय आहे. बसमध्ये सुविधांचा कोंडमारा झाला आहे. बसमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे.
- प्रदीप जाधव, प्रवासी
अशी आहे सेवा...
२०१७ पासून 'शिवशाही' बस सेवेत
७९२ एसटीच्या ताफ्यातील बस
५०० बस रस्त्यावर धावत आहेत
बस बंद पडण्याचे प्रमाण अधिक