
पुणे (Pune) : आंबेगाव बुद्रुक येथील तुकारामनगरमधील इंटलटेक कंपनी ते गायमुख कॅार्नरपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी सहा इंची पाइपलाइन टाकण्याच्या कामाला महापालिकेकडून (PMC) सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली वणवण संपणार आहे.
महापालिका हद्दीलगत असलेली गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर स्थानिकांना अनेक वर्षांपासून पाणी या मूलभूत समस्येवर तोडगा निघेल यांची अपेक्षा होती, परंतु महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते.
आंबेगाव बुद्रुक परिसरातील चार हजार वस्ती असलेल्या भागाला कायम टँकरद्वारे पिण्याचे पाणी घ्यावे लागत होते. त्यामुळे नागरिकांचा पाण्यावरच लाखो रुपयांचा खर्च होत होता.
गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यामुळे नागरिकांना जादा कर तर भरावा लागत होता, त्याबरोबर पाणीपट्टीही भरावी लागत होती. परंतु हे सर्व कर भरूनही नागरिकांना पाणीच मिळत नसल्यामुळे नागरिक महापालिकेतील गावांच्या समावेशाचा विविध मार्गांनी निषेध करत होते. मात्र आता येथे पाइपलाइन टाकण्याच्या कामाला सुरवात झाल्याने या भागातील नागरिकांना अखेर त्यांना न्याय मिळाला आहे.
हे काम सुरू झाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेण्यात आला. यावेळी आंबेगावचे माजी सरपंच सिद्धार्थ वनशिव, उपसरपंच अनिल कोंढरे, सचिन वाल्हेकर, सचिन कोंढरे व कैलास आलगुडे उपस्थित होते.
गावाचा महापालिकेत समावेश झाल्यापासून या भागातील पाणी प्रश्नासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करत होतो. आज या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. आंबेगावकरांच्या वतीने आम्ही महापालिका प्रशासनाचे आभार मानतो.
- अनिल कोंढरे, माजी उपसरपंच, आंबेगाव बुद्रुक