
पुणे (Pune) : पुणे शहरासाठी आता एक महापालिका असून चालणार नाही. राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक अशा निकषांवर शहराचे काही भाग करावे लागतील. ‘पीएमआरडीए’ (PMRDA) म्हणजे महापालिका नाही हे लक्षात घ्यावे. पुण्यासाठी दोन स्वतंत्र महापालिका करण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी आता फार उशीर करून चालणार नाही, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांशी वार्तालापाचा कार्यक्रम पुणे श्रमिक पत्रकार संघाने मंगळवारी (ता. २४) आयोजित केला होता. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार चेतन तुपे, आमदार बापू पठारे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘महायुती सरकारच्या कार्यकाळाच्या पहिल्या टप्प्यात राज्याच्या व पुण्याच्या विकासाला गती मिळाली. मध्यंतरी झालेला सत्ताबदल, कोरोना अशा कारणांमुळे ही गती विस्कळित झाली. समान पाणीपुरवठा योजना, जायका अशा मोठ्या प्रकल्पांवर त्याचा परिणाम झाला. शहरासाठी बसची संख्या वाढविण्यावर भर देऊ. महापालिकेत सध्या प्रशासक राज असले तरी शहरातील समस्या निवडणुकीपूर्वी सोडवू.’’
मिसाळ म्हणाल्या, ‘‘आम्ही शहराच्या गतिमान विकासाला प्राधान्य देऊ. समाविष्ट गावांच्या समस्या सोडविण्यासही प्राधान्य असेल. शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होत आहे. कात्रज परिसरात मोठा बंधारा बांधून पाणी उपलब्ध करून देण्याचा विचार आम्ही करीत आहोत. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पुढील नियोजन करण्यावर भर देऊ.’’
तापकीर म्हणाले, ‘‘शहरातील मोठ्या प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी नागरिकांकडून रोख मोबदल्याची मागणी होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी ‘क्रेडीट नोट’ सारख्या पर्यायांचा विचार आपल्याला करावा लागेल. खडकवासला ते खराडी मेट्रोचे कामाला गती मिळावी. समाविष्ट गावांचे प्रश्न सोडविण्यासाठी अतिरिक्त निधी मिळावा. गावे विकसित होईपर्यंत ग्रामपंचायतीच्या दरानेच कर आकारला जावा म्हणून आम्ही पाठपुरावा करू.’’
तुपे म्हणाले, ‘‘समाविष्ट गावे व वाढत्या लोकसंख्येचा पुणे महापालिकेवर ताण पडत आहे. त्यासाठी पुण्याच्या पूर्व व पश्चिम अशा दोन स्वतंत्र महापालिका कराव्या लागतील. वाहतूक, पाणी, आरोग्य, कायदा सुव्यवस्था, शिक्षण, क्रीडा, पर्यावरण व स्वच्छता या विषयांवर शहराचा भविष्यातील आराखडा तयार करावा. भविष्यातील मेट्रो मार्ग भुयारीच असावेत. शहरात समान पाणीपुरवठा योजना कार्यान्वित व्हावी आणि अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’
शिरोळे म्हणाले, ‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील उड्डाणपूल दोन-तीन महिन्यांत वापरासाठी खुला होईल. रिंगरोडसाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो येत्या वर्षात सुरु होईल. महापालिकेचे विविध प्रकल्प मार्गी लावण्याबरोबरच सार्वजनिक स्वच्छतागृहांचे लेखापरीक्षण करण्यास प्राधान्य देऊ.’’
वारजे ते थेऊरपर्यंत नदीकाठ रस्त्याची गरज
पठारे म्हणाले, ‘‘शहरातील पाणीपुरवठा समस्या, वाहतूक समस्या बिकट होत आहेत. वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून वारजे ते थेऊरपर्यंत नदीकाठाने रस्ता करण्याची गरज आहे. विकास आराखड्यातील रस्ते झाले पाहिजेत. शासकीय जागांवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून संबंधित जागा सार्वजनिक कारणांसाठी उपयोगात आणल्या पाहिजेत.’’