
पुणे (Pune) : सिंहगड रस्त्यावर (Sinhgad Road) राजाराम पुलाच्या कोपऱ्यावर जानेवारी महिन्यात काही तरी कामानिमित्त रस्ता खोदला, त्यानंतर आजपर्यंत महापालिकेने तो दुरुस्त केला नाही.
या चौकात आधीच उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असताना त्यात आणखी भर पडत आहे, शिवाय तेथे दुचाकी घसरत आहे. महापालिकेला हा छोटासा पॅच दुरुस्तीसाठी कधी वेळ मिळणार, असा प्रश्न सिंहगड रस्त्यावर राहणारे केदार देशपांडे यांनी उपस्थित केला.
रस्ते उकरून ठेवले
शहराच्या विविध भागातील रस्त्यांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये सिंहगड रस्त्याप्रमाणेच इतर भागातील विदारक स्थिती समोर आली. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत असले पाहिजेत, यासाठी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांसह क्षेत्रीय कार्यालयाकडील अभियंत्यांना आदेश दिले आहेत. पण, या आदेशानुसार कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले.
बिबवेवाडीतील चिंतामणीनगर येथील रस्ता करण्यासाठी तो उकरून ठेवला आहे, गेल्यावर्षीपासून त्याचे काम सुरू आहे. गेल्या पावसाळ्यात नागरिकांनी प्रचंड त्रास सहन केला. यंदाही या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार नसल्याचे दिसून आले आहे.
काम अर्धवट आहेच, पण उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अप्पर इंदिरानगर येथील रस्ते उकरून ठेवले आहेत. तसेच ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, ते गेल्या वर्षभरात बुजविले गेले नाहीत.
अपघातांचा धोका
गंगाधाम-कोंढवा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, दुभाजकाच्या बाजूने रस्ता व्यवस्थित न केल्याने व खड्डे न बुजविल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आलेला आहे.
टिंबर मार्केट येथे रस्ता खोदल्यानंतर त्यावर डांबरीकरण न करताच काम अर्धवट ठेवले आहे. त्यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
दक्षिण उपनगरात अर्धवट कामे
शहराच्या मध्यवर्ती भागासह दक्षिण भागात खराडी, मुंढवा, मांजरी, विश्रांतवाडी, धानोरी, विमाननगर, वडगाव शेरी परिसरातील रस्त्यांची अशीच अवस्था आहे. खराडी बाह्यवळण मार्गावरील दुर्गा माता चौकात रस्ता खोदून ठेवला आहे, तेथील कामही अर्धवट आहे.
सिमेंट काँक्रिटीकरणाचे कामही संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंढवा-केशवनगर, मुंढवा-मांजरी या दोन्ही रस्त्यांची चाळण झालेली आहे. ठिकठिकाणी खडी पसरल्याने, खड्डे पडल्याने अपघातांत वाढ होत आहे.
वाहतुकीचा खोळंबा
शहरातील रस्ते डांबरीकरणासाठी ३०० कोटी रुपये खर्च करत असल्याचा मोठा गाजावाजा महापालिका करत आहे. पण, प्रत्यक्षात पावसाळा तोंडावर आला तरी शहरात खड्डे कायम आहेत. नवीन रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. खोदकाम केले तरी तेथील राडारोडा उचलणे, डांबरीकरण करणे यांसारख्या कामांना महिनोंमहिने लागत आहेत. मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील रस्त्यांना कोणी वाली आहे की नाही? अशी भयानक अवस्था झालेली आहे.
शेकडो कोटींच्या कामाचे धुमधडाक्यात भूमीपूजन करायचे आणि नागरिकांना रोज ज्या कारणामुळे रस्त्याने जाताना त्रास होतोय, अशी छोटी-छोटी रस्त्याची कामे अर्धवट ठेवून वाहतुकीचा खोळंबा करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीतील रस्त्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास दिसत नाही का? असाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
जुन्या टेंडरची मुदत संपली असून, रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ४२ कोटी रुपयांची नवीन टेंडर काढण्याची प्रक्रिया दोन आठवड्यांत पूर्ण होईल. त्यामधून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतच रोड मेन्टेनन्स व्हॅनच्या माध्यमातून कामे केले जातील. उपनगरांमधील रस्त्यांची कामेही केली जातील.
- साहेबराव दांडगे, अधिक्षक अभियंता, पथ विभाग