पुणे (Pune) : मुठा उजवा कालव्याच्या जागेतून खडकवासला धरणातील पाणी बोगद्याद्वारे फुरसुंगीपर्यंत नेण्याच्या प्रकल्पाची राज्य सरकारकडून चाचपणी सुरू आहे. दरम्यान, बोगद्यावरून हडपसर, फुरसुंगीसाठी २७ किलोमीटरचा पर्यायी रस्ता उपलब्ध होऊ शकतो. हा रस्ता कसा करता येईल, त्यामध्ये कोणकोणत्या अडचणी आहेत, याचा विचार सुरू आहे. त्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सरकारला दिला जाणार आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले.
खडकवासला धरणातून उजव्या कालव्याद्वारे ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. सध्या हा कालवा जुना झाला असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती व बेकायदा उपसा होतो. या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बंद पाइपलाइन तसेच बोगदा बांधून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईमध्ये संबंधित प्रकल्पाबाबत मागील आठवड्यात महापालिका, पाटबंधारे विभागासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता कपोले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीबाबत कुमार म्हणाले, ‘‘सध्या मुठा उजव्या कालव्याची जागा पाटबंधारे विभागाची आहे. खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत सुमारे २७ किलोमीटरचा कालवा असून तेथे बोगदा व त्यावर रस्ता केल्यास हडपसर, फुरसुंगीला जाण्यासाठी २७ किलोमीटरचा पर्यायी रस्ता उपलब्ध होऊ शकतो.
याबरोबरच उड्डाणपूल किंवा मेट्रो मार्गिका यासाठी ही उपयोग होऊ शकतो का? याचा देखील अभ्यास करण्याबाबत बैठकीत निर्णय बैठकीत झाला. ड्रोनद्वारे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून एक महिन्यात त्याबाबतचा अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर याबाबत पुण्यात बैठक होणार असून त्यामध्ये हा अहवाल सादर केला जाईल.’’
खडकवासला धरणातून कालव्याद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यादरम्यान पाण्याची चोरी, बाष्पीभवन व अन्य कारणामुळे बाष्पीभवन व पाणी गळती होते. मात्र फुरसुंगीपर्यंत बोगद्यातून पाणी नेल्यास तीन टीएमसी पाण्याची बचत होऊ शकते. या प्रकल्पासाठी २२०० कोटी रुपये इतका खर्च होणार आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका