.jpg?rect=0%2C1%2C1640%2C923&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे (Pune) : पावसाळ्यात शहरात २०१ ठिकाणी पाणी तुंबून ही ठिकाणे धोकादायक होतात. त्यामुळे या ठिकाणी महापालिकेने पाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. ही कामे २१ मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक झाली. त्यामध्ये पाणी तुंबणाऱ्या जागांसंदर्भात चर्चा करण्यात आली. महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, मलनिःसारण विभाग, क्षेत्रीय कार्यालये आणि पोलिसांकडून शहरातील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात २०१ ठिकाणांचा समावेश आहे.
केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेत महापालिकेला निधी मिळाला आहे, त्यातून जी कामे सुरू आहेत त्यापैकी २०१ पैकी २१ ठिकाणांचा समावेश आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेतून सध्या ६६ ठिकाणी कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी पावसाळी गटार टाकणे, कलव्हर्ट बांधणे, बॉक्स पावसाळी गटार टाकणे ही कामे सुरू आहेत. यातील काही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, तर कलव्हर्ट बांधण्याचे काम लगेच पूर्ण होणार नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.