शहराच्या वाढत्या विस्तारामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला मोठा निर्णय

PCMC
PCMCTendernama
Published on

पिंपरी (Pimpri): पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वेगाने होत असल्यामुळे आपत्कालीन सेवा वेळेवर पोहोचणे आणि प्रत्येक प्रभागात आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिका अग्निशमन विभागाने शहरातील विविध भागांमध्ये नव्या अग्निशमन केंद्रांची उभारणीचे नियोजन केले आहे. काही केंद्रांचे काम अंतिम टप्प्यात असून, काहींसाठी जागा निश्चिती व टेंडर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

PCMC
मला भूमिपूजनाला बोलावू नका! असे का म्हणाले नितीन गडकरी?

पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने विकसित होत असून, त्यानुसार सुरक्षितता उपायांची आवश्यकता अधिक महत्त्वाची ठरते आहे. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे प्रतिसाद वेळ कमी करणे, शहराच्या प्रत्येक भागात अग्निशमन सेवा पोहोचवणे, मोठ्या औद्योगिक वसाहतींसाठी विशेष सुविधा निर्माण करणे, रहिवासी वस्त्यांमध्ये, नव्या टाउनशिपमध्ये तत्काळ मदत देणे या अनुषंगाने आणखी अग्निशमन केंद्रे बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

सध्या १० केंद्र कार्यरत
मुख्य अग्निशमन केंद्रासह (संत तुकारामनगर, पिंपरी) भोसरी, मोशी, चिखली, तळवडे, रहाटणी, थेरगाव, प्राधिकरण, चोविसावाडी आणि नेहरूनगर असे नऊ उपअग्निशमन केंद्र आहेत. त्यांद्वारे या केंद्रांमधून शहराच्या ‘२४ बाय सात’ स्वरूपात सेवा दिली जात आहे. औद्योगिक आणि निवासी भागांसाठी ही केंद्रे महत्त्वाची ठरत आहेत.

सध्या बांधकाम सुरू
पिंपरी महापालिका भवनामागे अग्निशामक मुख्यालयासह पुनावळे, दिघी, निगडी प्राधिकरण येथील हेडगेवार भवन येथे अग्निशमन केंद्रांची बांधकामे सुरू आहेत.

प्रस्तावित तीन केंद्र
पिंपळे निलख येथील संरक्षण खात्याच्या जागेत अग्निशामक केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगररचना व इ क्षेत्रीय (स्थापत्य) कार्यालयामार्फत चऱ्होलीतील वर्ल्ड प्राइड सिटी परिसरात भूसंपादन करून बांधकाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भोसरी एमआयडीसी एफ-२ ब्लॉकमध्ये क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अग्निशमन केंद्र बांधकामविषयक टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

PCMC
Devendra Fadnavis: प्रत्येक तालुक्यातील 10 गावे होणार स्मार्ट अन् इंटेलिजेंट; काय आहे प्लॅन?

शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, प्रत्येक प्रभागात आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. नव्या अग्निशमन केंद्रांमुळे मदतीचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल आणि नागरिकांचा जीव व मालमत्तेचा अधिक चांगल्या पद्धतीने बचाव करता येईल. भविष्यातील आकस्मिक संकटांचा वेळीच मुकाबला करता यावा, यासाठी ही केंद्रे नागरिकांसाठी सुरक्षा कवच ठरतील.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

शहराच्या गरजेनुसार विविध प्रभागांमध्ये अग्निशामक केंद्र सुरू करण्यासाठी जागा निश्चिती, आराखडा मंजुरी व निधी वितरणासंबंधी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी शहर रचनेत अग्निशमन केंद्र केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर धोरणात्मकदृष्ट्याही संतुलित असावीत, यावर आमचा भर आहे. परिणामी, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आली तरी प्रतिसाद वेळ महत्त्वाचा राहील आणि मनुष्यहानी व वित्तहानी टाळता येईल.
- प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

नव्या केंद्रांमध्ये आधुनिक उपकरणे, जलद प्रतिसाद देणारे व्हेईकल्स आणि प्रशिक्षित कर्मचारी असतील. प्रत्येक केंद्र स्थानिक गरजेनुसार आणि त्या भागातील संभाव्य धोके लक्षात घेऊन यंत्रणा उभी करत आहे. औद्योगिक क्षेत्रांमध्ये केमिकल फायरसाठी विशेष उपाययोजना, तर रहिवासी भागात धुरामुळे होणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. या अग्निशामक केंद्रांच्या माध्यमातून आम्ही सुरक्षेवरही भर देणार आहोत.
- उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, अग्निशमन विभाग, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com