
पुणे (Pune) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ताफ्यातील शिवशाही बसचे (Shivshahi Bus) रुपांतर साध्या एसटीबस (ST Bus) मध्ये होणार आहे. येत्या २८ तारखेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल. या निर्णयामुळे फक्त अंतर्गत रचनेत बदल होईल, पण गाड्यांची स्थिती काही बदलणार नाही अशीच चिन्हे आहेत.
राज्यात शिवशाहीच्या ७९० गाड्या आहेत. मात्र बसची स्थिती बिकट असल्याने प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे केवळ रुपांतर करून हा प्रश्न सुटणार नाही. बसचे इंजिन तसेच अंतर्गत रचनेत (चॅसी, बॉडी) काहीच बदल होणार नसल्याने देखभाल व दुरुस्तीचा प्रश्न कायम राहील. परिणामी प्रवाशांसाठी समस्यांची ‘यात्रा’ सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.
महामंडळाच्या ताफ्यातील बसची संख्या कमी होत आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने 'शिवशाही' सेवेतून थेट बाजूला न काढता तिचे रुपांतर साध्या एसटीमध्ये म्हणजेच लालपरीत करीत आहे. यावर संचालकांच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
अंतर्गत बदल असे
- शिवशाही बसचे रूपांतर साध्या एसटीमध्ये करताना सर्वात आधी रचनेत (बॉडी) बदल
- वातानुकूलन यंत्रणा नसल्यामुळे मोठ्या काचा काढल्या जाणार
- आसनांच्या रचनेत बदल होणार
- दोन-दोनची आसने असणार
- खिडक्यांना काचेची तावदाने असणार
शिवशाही बसच्या समस्या
- बसमधील वातानुकूलित यंत्रणा बंद राहणे
- आसनांची स्थिती खराब
- वातानुकूलन यंत्रणा बंद झाल्यावर बसही बंद पडते
- बसमध्ये प्रचंड अस्वछता
- गाडी मध्येच बंद पडण्याचे (ब्रेकडाऊन) प्रमाण अन्य बसच्या तुलनेत जास्त
शिवशाहीचे रुपांतर साध्या बस मध्ये करताना प्रशासनाला खूप बाबींमध्ये बदल करावा लागणार आहे. ही बाब खर्चिक असेल. त्यामुळे एसटी प्रशासनाने शिवशाहीचे साध्या बसमध्ये रूपांतर करण्याऐवजी नवीन बसची खरेदी करावी.
- संदीप शिंदे, महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटना, अध्यक्ष