पुणे (Pune) : नाले सफाई, पावसाळी गटारांच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिका २५ कोटी रुपये खर्च करत आहे. शहरात पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येत असून, २०१ पैकी ११७ ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ८४ पैकी ३८ ठिकाणी कामे सुरू असून, ३९ ठिकाणी पावसाळ्यापूर्वी कोणतेही काम करता येणार नाही. या धोकादायक ठिकाणी तात्पुरती उपाययोजना करा. कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहरात पाणी तुंबल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करा, असे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले आहेत.
पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या सुरू केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी आज (ता. १६) महापालिकेत बैठक घेतली. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासने, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले आदी उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांपासून अनेक भागांत पाणी तुंबत आहे. प्रशासनाने अशा ठिकाणी उपाययोजना केल्या आहेत. पाणी तुंबून नागरिकांचे जनजीवन विस्कळित होऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे. मलनिःसारण विभाग, क्षेत्रीय कार्यालये, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याचे आदेश द्यावेत. नाले सफाई व पावसाळी गटारांची स्वच्छता करूनही पाणी तुंबले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करा, असे आदेश दिले आहे.’’
पुन्हा एकदा अहवाल सादर करा
शहरातील नाले सफाई व पावसाळी गटारांची स्वच्छता केली आहे असे आयुक्तांनी सांगितले. पण आतापर्यंत झालेल्या कामांचा अहवाल पुन्हा एकदा मागवून घ्या, त्यात फोटो आणि व्हिडिओचाही समावेश असला पाहिजे. ही कामे दर्जेदार झाली पाहिजेत. ठेकेदारांनी कमी दराने निविदा भरल्याने त्यांना निकृष्ट दर्जाची कामे करता येणार नाहीत. जर चांगली कामे केली नाहीत तर त्यांना काळ्या यादीत टाका, असे आदेशही मोहोळ यांनी दिले.
२०० कोटींचा निधी आणण्याचा पुनरुच्चार
शहरातील नाल्यांना सीमा भिंत बांधण्यासाठी राज्य सरकारने २०० कोटींचा निधी मंजूर केला होता. यात मोहोळ यांची भूमिका महत्त्वाची होती. पण हा निधी मंजूर होऊन दीड वर्ष उलटून गेला तरीही महापालिकेला पैसे मिळालेले नाहीत. तसेच यासाठी काढलेल्या निविदा आमदारांनी विरोध केल्याने रद्द कराव्या लागल्या. शहरात पुराचा धोका असतानाही ही कामे झालेली नाहीत. त्यावर मोहोळ यांनी हा २०० कोटींचा निधी सरकारकडून आणणार असून ही कामे केली जातील, असे मोहोळ यांनी सांगितले.