
पुणे (Pune) : पुणे-शिरूर या ५४ किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलासाठी ७ हजार ५१५ कोटींची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या प्रकल्पाला आता वेग येणार असल्याने प्रवासी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते शिरूर हे अंतर दोन ते अडीच तासांऐवजी अवघ्या ८० मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. या तरतुदीमुळे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या प्रवासी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरून विदर्भ, मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्रात ये-जा करणारी वाहने, तसेच रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहत व अष्टविनायक दर्शनासाठी येणाऱ्या वाहनांसह या मार्गावरून दररोजच्या वाहनांची संख्या सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त आहे. वाढती वाहन संख्या व तुलनेने अपुरा महामार्ग यामुळे या मार्गावर वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, सणसवाडी, रांजणगाव, कारेगाव, सरदवाडी, शिरूर भागात सतत वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावत आहे. या मार्गावरील उद्योगांवर, तसेच एकूण विकासावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दुमजली उड्डाण पूल प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दृष्टिक्षेपात उड्डाण पूल प्रकल्प
एमएसआयडीसीच्या माध्यमातून पुणे ते शिरूर रस्त्यावर बांधण्यात येणारा बहुमजली उड्डाण पूल प्रकल्प डिझाइन, फायनान्स, बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर (डीएफबीओटी) या मॉडेलवर सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारला जाणार आहे.
पुणे (खराडी चौक) ते शिरूरदरम्यान सहापदरी उन्नत मार्ग
एकूण लांबी - ५४ किलोमीटर
या अत्याधुनिक उड्डाण पुलाला खराडी, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर या पाच ठिकाणी एन्ट्री व एक्झिट
या प्रकल्पासाठी आवश्यक तेथे भूसंपादन करण्यात येणार
नियोजित मार्गाचा अंदाजित खर्च ७ हजार ५१५ कोटी
शिरूरपर्यंत मेट्रो सेवा झाल्यास धार्मिक, उद्योग, वैद्यकीयसह सर्व क्षेत्रांना फायदा
उन्नत मार्गाचाच पर्याय का?
पुणे ते शिरूरदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून, रस्त्यालगत अनेक गावांत नागरी वस्त्यांसह उद्योगव्यवसायही सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करणे अवघड आहे. त्यामुळे दुमजली उड्डाण पुलासारखा उन्नत मार्गच करणे हाच योग्य पर्याय असल्याने उड्डाण पुलाचा प्रकल्प शासनाकडून हाती घेण्यात आला. जेणेकरून सध्या गर्दीच्या वेळी दोन ते अडीच तास लागणारे हे अंतर कोणताही अडथळा नसल्याने केवळ ८० मिनिटांत पार करणे शक्य होईल, हा शासनाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईलच, तसेच एमआयडीसीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी चांगला पर्याय होऊन सर्वसामान्य प्रवाशांसाठीही एसटी व पीएमपीच्या वेगवान प्रवासासाठी बस थांब्यांसह व्यवस्था करणे शक्य होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कोंडीची कारणे
पुणे ते वाघोली टप्प्यात जवळपास एक लाख ‘पीसीयू ट्रॅफिक’
औद्योगिक क्षेत्रात हलकी तसेच मालवाहतूकदार अवजड वाहनांचीही मोठी वर्दळ
वाघोली-शिक्रापूर भागातील नोकरदार, व्यावसायिकांची वाहने
महामार्गावरील अनधिकृत रिक्षा व खासगी बस थांबे.
वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन
विरुद्ध दिशेने सर्रासपणे येणारे वाहनचालक
रस्त्यालगत टपऱ्या, हातगाड्या, पथारीवाल्यांचे अतिक्रमण
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अष्टविनायकांपैकी महत्त्वाचे असलेले श्रीक्षेत्र रांजणगाव देवस्थान, तसेच मोठी औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे सध्या वनाज ते रामवाडीपर्यंत सुरू असलेली मेट्रो सेवा पुढे शिरूरपर्यंत वाढविल्यास अष्टविनायक दर्शनासाठी येणारे भाविक तसेच नोकरीनिमित्त नियमित ये-जा करणाऱ्या कामगार वर्गाची मोठी सोय होईल. भाविक व कामगारांच्या सोयीबरोबरच व्यवसाय, शेती, शिक्षणासह विविध कारणांनी नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांची सध्या होणारी गैरसोय टळेल. तसेच अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होऊन वाहतूक कोडींत अडकणाऱ्या रुग्णांनाही वेळेत उपचार मिळाल्याने प्राणहानी टळेल.
- स्वाती दत्तात्रेय पाचुंदकर, अध्यक्षा, श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट
पुणे ते शिरूर टप्प्यात अनेक गावांत रस्त्यालगत नागरी वस्त्यांसह उद्योगव्यवसायही असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करणे अवघड आहे. अशा ठिकाणी गावाबाहेरून बाह्यवळण रस्त्यांचा विचार केल्यास प्रवासी व नागरिकांना कोंडीचा होणारा त्रास टळून हा प्रकल्प अधिक प्रभावी ठरणार आहे. १ जानेवारीला पेरणे, तसेच कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या बांधवांनाही पेरणे-कोरेगाव भीमामार्गे पर्यायी बाह्यवळण रस्त्यांचा फायदा होऊन राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याची गरज राहणार नाही.
- उषा दशरथ वाळके, सरपंच, पेरणे
वाहतूक कोंडीमुळे सर्वच उद्योगांवर अनिष्ट परिणाम होत असून, आता उड्डाण पूल प्रकल्प वेगाने झाल्यास उद्योगांना चालना मिळेल. मात्र, नव्या उड्डाण पूल प्रकल्पात औद्योगिक परिसर मेट्रो सुविधेने जोडला जाणे फार गरजेचे आहे. दरम्यान, या प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी शक्य तेथे पर्यायी रस्तेही सुरू करणे गरजेचे आहे. औद्योगिक परिसराला रेल्वे सुविधेबाबतही वेळोवेळी असोसिएशनने प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. त्याबाबतही विचार व्हावा.
- किरण पालेकर, माजी अध्यक्ष, रांजणगाव इंडस्ट्रिअल असोसिएशन
असे आहे नियोजन
पुणे (खराडी चौक) ते शिरूर ५४ किलोमीटर लांबीचा अखंड सहापदरी उन्नत मार्ग
खराडी चौक ते वाघोली या लांबीत दुसऱ्या लेव्हलला मेट्रोची सुविधा
या बहुमजली उड्डाण पुलावर सर्वांत वरच्या मार्गावर मेट्रो, त्याखालील मजल्यावरून चारचाकी हलकी वाहने, तर तळमजल्याच्या रस्त्यावरून अवजड वाहतूक अशी व्यवस्था असणार आहे
सध्या पुणे ते शिरूर अंतर पार करण्यासाठी गर्दीच्या वेळेस लागणारा दोन ते अडीच तासांचा वेळ उन्नत मार्गावरून सलग व वेगवान प्रवासामुळे ८० मिनिटांवर येणार