
पुणे (Pune) : जलप्रदूषण रोखण्याबरोबरच पाण्याची बचत करणाऱ्या आणि पर्यावरणपूरक असलेल्या खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रकल्पाचे काम पर्यावरण खात्याच्या मंजुरीअभावी रखडले आहे. त्यामुळे ही परवानगी कधी मिळणार, याकडे जलसंपदा विभाग डोळे लावून बसले आहे. त्यामुळे ‘हत्ती गेला शेपूट राहिले’, अशी या प्रकल्पाची अवस्था झाली आहे.
मागील वर्षी मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या कामासाठी जलसंपदा विभागाकडून तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. पात्र ठरल्याने या कंपनीच्या टेंडरला मान्यता देऊन विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच वर्क ऑर्डर देण्यात आली. त्यामुळे सुमारे तीन महिन्यानंतरही प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. यासंदर्भात जलसंपदा विभागाशी संपर्क साधला असता, पर्यावरण खात्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न मिळाल्यामुळे कामास अद्याप सुरुवात झालेली नाही. ते जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत काम सुरू करता येणार नाही, असे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाचे
- खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी येण्याची योजना जलसंपदा विभागाकडून तयार
- या प्रकल्पाच्या विस्तृत प्रकल्प अहवालास मुख्य अभियंता आणि त्यांनतर राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती (स्टेट लेव्हल टेक्निकल अॅडव्हायजरी कमिटी) आणि सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारकडून मान्यता
- या प्रकल्पामुळे सुमारे अडीच टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची बचत होणार
- अतिरिक्त ३ हजार ४७२ हेक्टरवरील क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार
- जलप्रदूषण रोखण्यास मदत होणार
काय आहे प्रकल्प?
७.८० मीटर रुंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंची अशा ‘डी’ आकाराच्या बोगद्यातून खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याचे जलसंपदा विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. सुमारे २८ किलोमीटर लांबीचा हा बोगदा असणार आहे. या बोगद्यामुळे कालव्याची क्षमता १५१० क्युसेक्स होणार असून ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होऊन अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे.