.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे (Pune) : दक्षिण पुण्यातील आंबेगाव (बुद्रुक) भारती विद्यापीठ, जांभूळवाडी, कोळेवाडी, दत्तनगर आणि इतर भागांतील नागरिक, वाहनचालक राजमाता भुयारी मार्गाचा वापर करतात. परंतु, जलवाहिनी, सांडपाणी वाहिनी, रस्त्याची व इतर कामे सुरू असल्याने सध्या हा भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दक्षिण पुण्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कात्रज ते नवले पुलापर्यंत ही कोंडी होत असून, वाहनचालकांकडून लवकर कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
कात्रज चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने चौकातील वाहतूक वळविण्यात आलेली आहे. त्यात आता विकासकामांसाठी राजमाता भुयारी मार्ग बंद केल्यामुळे कात्रज ते नवले पूलदरम्यान वाहतूक कोंडी होत आहे. कात्रज-कोंढवा रस्ता, कात्रज चौक, दत्तनगर-जांभूळवाडी रस्ता, भारती विद्यापीठ मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. तासन्तास वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे कामगार, नोकरदार वर्गाचे मोठे हाल होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका प्रशासनाने लवकर कामे पूर्ण करून राजमाता भुयारी मार्गातून वाहतूक सुरू करावी. या काळात भारती विद्यापीठ वाहतूक विभागाने वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन करावे. वाहतूक पोलिस व महापालिका वॉर्डन यांना रात्री नऊपर्यंत चौक व मुख्य रस्त्यावर नियमनाचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
राजमाता भुयारी मार्ग बंद केल्याने दत्तनगर-जांभूळवाडी रस्ता, कात्रज चौक परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने पोलिस प्रशासनाने काळजी घेणे गरजेचे आहे, तसेच महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे काम गतीने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी.
- कविता जोगदेव, स्थानिक रहिवासी
पुढील दोन ते चार दिवसांत काम झाल्यानंतर हा मार्ग सुरू करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार आहे, तसेच काम गतीने पूर्ण करण्याकडे आमच्यासह सर्वच विभागांचा कल आहे. त्यामुळे लवकरात लवकर कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्यात येईल.
- दिलीप पांडकर, उपअभियंता पथ विभाग, महापालिका