
सोलापूर (Solapur) : सोलापूर महापालिकेतर्फे सध्या शहरातील मुख्य चौकांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. ही स्वच्छता मोहीम म्हणजे महापालिकेचा केवळ दिखाऊपणा आहे. पुढील काही दिवसांत केंद्रीय पथक शहराच्या सर्वेक्षणासाठी येणार असल्याच्या धास्तीमुळे ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असल्याचे मत शहरवासीयांसह लोकप्रतिनिधी व्यक्त करीत आहेत.
महापालिकेने शहर स्वच्छतेबाबत सुरू केलेल्या मोहिमेत ३६५ दिवस सातत्य ठेवले पाहिजे, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहिमेद्वारे शहरातील मुख्य चौकांची व दुभाजकांची स्वच्छता करण्याचे काम २ डिसेंबरपासून सुरू केले आहे. यामध्ये शहरवासीयांसह सामाजिक संस्थांनी देखील सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने करत स्वच्छतेस सुरवात केली आहे. मात्र येत्या काही दिवसांत या अभियानाद्वारे शहरात केलेल्या स्वच्छतेचे सर्वेक्षण केंद्र सरकारचे पथक करणार आहे.
केंद्रीय पथकाच्या समाधानकारक अहवालानंतरच महापालिकेला निधी मिळणार असल्याने ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे, अशी चर्चा सोलापूरकरांमध्ये आहे. त्यामुळे महापालिका शहराच्या मुख्य चौकांमध्ये करत असलेल्या स्वच्छतेला शहरवासीयांमधून निव्वळ दिखावा असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील स्वच्छतेची खरी गरज असलेल्या चौकांची स्वच्छता न करता महापालिका केवळ सोयीच्या चौकांमध्येच स्वच्छता करत असल्याचाही नागरिकांचा आरोप आहे.
महापालिकेने शहरात राबविलेली मोहीम म्हणचे निव्वळ दिशाभूल आहे. केवळ पंधरा दिवस स्वच्छता करून निधी लाटण्याचे काम महापालिका करत आहे. शहराची अवस्था पाहिल्यास स्वच्छतेचे प्रमाण व महापालिकेचा खरेपणा उघड होईल. वर्षभर स्वच्छता करण्याची महापालिकेची मानसिकता हवी. स्वच्छ वायू उपक्रमांतर्गत तयार केलेले रस्ते सहा महिन्यांत खराब झाल्याने पुन्हा त्या रस्त्यांवर धूळ वाढली आहे.
- रियाज खैरदी, माजी नगरसेवक
केंद्राकडून निधी घेण्यासाठी महापालिकेने स्वच्छता करू नये. महापालिका अधिकाऱ्यांनी शहरात स्वच्छता किती आहे हे आधी तपासावे. सोयीच्या ठिकाणी स्वच्छता करून दिखावा करू नये. शहरात सर्वत्र अस्वच्छता आहे ती संपवावी. अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी वर्षभर स्वच्छता मोहिमेची प्रामाणिक कार्यवाही करावी.
- आरिफ शेख, माजी महापौर
महापालिका अधिकारी निधी लाटण्यासाठी स्वच्छता करत आहेत. केंद्रीय पथकाने ‘अ’ मानांकन दिले तरच निधी मिळतो. ठराविक भागातच मोहीम राबवणे म्हणजे जनतेच्या व केंद्रीय पथकाच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखे आहे. निव्वळ मलई लाटण्याचा प्रकार आहे. वर्षभर स्वच्छता केली जात नाही. अद्यापही शहरात अनेकांना उघड्यावर शौचाला जावे लागते. अशा स्थितीत शहर स्वच्छतेचा महापालिकेने दावा करणे म्हणजे हास्यास्पद व अक्षम्य आहे. जनतेची दिशाभूल करून आलेला निधी खर्च केल्याचा दिखावा महापालिका अधिकारी करतात. स्वच्छतेबाबत दररोज अहवाल महापालिकेने जनतेसमोर सादर करून वर्षातील ३६५ दिवस शहर स्वच्छ ठेवावे.
- राजेश काळे, माजी उपमहापौर