
सोलापूर (Solapur) : सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलांचा आर्वे कंपनीकडून नव्याने सुधारित विकास आराखडा तयार केला जाणार आहे. या सुधारित आराखड्यासाठी ९६६ कोटी २४ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली. (Solapur City Flyover News Update)
सोलापूर शहरातील जुना पूना नाका ते पत्रकार भवन व जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन, असे दोन उड्डाणपूल २०१५ मध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्री असताना मंजूर करून घेतले. त्यानंतर उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाऐवजी स्मार्ट सिटी योजनेतून करण्याचा निर्णय झाला. या योजनेतून वगळून पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपुलांचे काम करण्यावर २०१९ मध्ये शिक्कामोर्तब झाले.
उड्डाणपुलाच्या विकास आराखड्यामध्ये आतापर्यंत तीन वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ पासून जुना पूना नाका ते पत्रकार भवन या फेज वन मार्गावरील भूसंपादनाला सुरवात झाली. भूसंपादनाची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने उड्डाणपुलाचे काम रखडले.
आता या मार्गाचे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. आता जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन या फेज दोन मार्गावरील भूसंपादन गतिमान पद्धतीने सुरू आहे. दरम्यान, या उड्डाणपुलासाठी शासनाने सहा महिन्यापूर्वी ११०० कोटींच्या कामाची अधिसूचना काढली होती.
या उड्डाणपुलासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. उड्डाणपुलाच्या कामाचा विकास आराखडा यापूर्वी स्पेक्ट्रम कंपनीने केला होता. आता हे काम आर्वे कंपनीकडे देण्यात आले आहे.
असा हा नवा विकास आराखडा
- चार पदरी उड्डाणपूल,
- उड्डाणपुलाला सहा ठिकाणी प्रवेश आणि निर्गमन रॅम्प असणार आहेत.
- नऊ मीटरचे दोन सर्व्हिस रोडही असणार आहेत.
मी पालकमंत्री असताना २०१५ मध्ये दोन उड्डाणपूल मंजूर केले होते. या कामासाठी १२०० कोटी रुपये मंजूर झाले होते. भूसंपादनामुळे काम रखडले. दरम्यान राज्यातील सत्ता गेली आणि या कामाला ब्रेक लागला. आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर भूसंपादनाच्या कामाला गती आली आहे. केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला.
काही तांत्रिक कारणास्तव सुधारित विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. नुकतीच आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे दोनवेळा बैठक लावून हा विषय मार्गी लावला आणि ९६६ कोटी रुपये मंजूर करून घेतले. अनेक वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाला आता गती येणार आहे.
- विजयकुमार देशमुख, आमदार, शहर उत्तर