
सोलापूर (Solapur) : सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतून गावांसाठी पाणी पुरवठ्याच्या १३८ योजना पूर्ण झाल्या आहेत. योजना पूर्ण झाल्या आहेत, परंतु योजनेची देयके ठेकेदाराला देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे/शासनाकडे पैसा नाही. या योजनेतून काम पूर्ण केलेल्या ठेकेदारांना देयके देण्यासाठी ६२ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. शासनाकडून हा निधी आल्यानंतर ठेकेदारांची देयके अदा केली जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर जल’साठी जलजीवन मिशन हाती घेतले. ही योजना जशी आली तशी सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशन कायमच चर्चेत राहिले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात निविदा प्रक्रियेत झालेला गैरप्रकार आणि काम पूर्ण केलेल्या ठेकेदारांना देयके देण्यासाठी शासनाच्या तिजोरीत असलेला खडखडाट यामुळे ही योजना चर्चेत आली आहे. जलजीवन मिशनमधून कामे पूर्ण झाली आहेत, परंतु या योजनेतून उन्हाळ्यात गावांना पाणी मिळणार का?, हा देखील प्रश्न चर्चेत येऊ लागला आहे.
या योजनेसाठी निवडलेले जलस्त्रोत आतापासूनच कोरडेठाक पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्यावेळी पाण्याची गरज असते, त्या मार्च, एप्रिल व मे महिन्यात या योजनेतून गावांची तहान भागणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जलजीवन मिशनमधून सोलापूर जिल्ह्यासाठी ९६४ च्या आस योजना हाती घेण्यात आल्या आहेत. अनेक आरोप-प्रत्यारोप सहन करत या योजना आता अंतिम टप्प्यात आहेत. या योजनेसाठी लागणारा निधी शासनाकडून मिळत नसल्याने ठेकेदारांची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे.
ज्या ठेकेदारांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यांना त्यांची देयके देण्यासाठी आम्ही शासनाकडे निधीची मागणी केली आहे. हा निधी मिळावा, यासाठी वारंवार पाठपुरावाही करत आहोत. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर अनुक्रमानुसार ठेकेदारांना त्यांची देयके अदा केली जातील.
- संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद