
सातारा (Satara) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा नवीन आराखडा सरकारला सादर करण्यात आला आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील सुमारे ११० गावांचा समावेश झाला असून, यवतेश्वर, कास पठार, दरे, संपूर्ण परळी खोरे, दहिवड या भागाचा समावेश झाला आहे. या गावांचा आता नवीन महाबळेश्वर प्रकल्पातून पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणार आहे. त्याचा विकास आराखडा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून तयार होणार आहे.
सध्या पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात होणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाविषयी उत्सुकता आहे. कोयना धरण जलाशयाचे बॅक वॉटर आणि परिसरातील तब्बल २३५ गावांचा विकास साधून नवीन महाबळेश्वर निर्माण केले जाणार होते. सुरुवातीला या प्रकल्पात सातारा तालुक्यातील ३४, पाटण तालुक्यातील ९५, जावळी तालुक्यातील ४६ व महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावांचा समावेश केला आहे. महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी पसंती असते. त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी मोठ्या संख्येने वाढत आहे. या परिसरावर येणारा पर्यटकांचा ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने हा प्रकल्प विकसित करण्यासाठी पाऊल उचलले आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात असून, त्यांनी या प्रकल्पात आणखी नव्याने येणाऱ्या गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सुधारित आराखडा तयार करून तो शासनास सादर केला आहे.
या आराखड्यात एमएसआरडीसीने २९५ गावांचा नवीन प्रस्ताव तयार केला आहे. मूळ प्रस्तावात सातारा जिल्ह्यातील २३५ गावांचा समावेश होता. एक हजार १५३ चौरस किलोमीटर पसरलेले, नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन अधिसूचित क्षेत्र चार नियोजन विभागांमध्ये विभागले गेले आहे आणि जास्तीतजास्त पर्यटन क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने १३ पर्यटन क्षेत्रांमध्ये वर्गीकृत केले आहे. वाढीव २९५ गावांमध्ये सातारा तालुक्यातील ११० गावांचा समावेश करताना यवतेश्वर परिसर, कास पठार, दरे, परळी खोरे, दहिवडपर्यंतच्या भागाचा विचार झाला आहे. त्यामुळे सातारा तालुक्यातील या भागाचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व वाढणार आहे.