
मुंबई (Mumbai) : गोरेगांव-मुलूंड लिंक रोड (Goregoan Mulund Link Road) हा पूर्व व पश्चिमेला जोडणारा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबईत वेळेला महत्व आहे. किती किमी अंतर आहे, त्यापेक्षा हे अंतर किती कमी वेळात पार केले जाईल याला महत्व आहे. पश्चिम उपनगरात लोकसंख्या वाढते आहे. त्यामुळे ईस्ट-वेस्ट कनेक्टिव्हिटीसाठी (East West Connectivity) गोरेगाव मुलूंड लिंक रोड प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. प्रकल्पात दोन्ही कडून रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. या प्रकल्पातील रस्त्यांवर सायकल ट्रॅक, फूटपाथ असतील. हा प्रकल्प रेकॉर्ड ब्रेकिंग वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास पर्यावरण व राज्यशिष्ठाचार मंत्री, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackarye) यांनी व्यक्त केला.
मुंबई महानगरपालिकेकडून बांधण्यात येणाऱ्या गोरेगांव-मुलूंड लिंक रोडवरील उड्डाणपुलाचे भूमिपूजन जनरल अरूण कुमार वैद्य मार्ग, वाघेश्वरी मंदिरासमोर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. गोरेगाव-मुलूंड लिंक रोडवर संभाव्य वाहतूकीसाठी दिंडोशी सत्र न्यायालय ते संतोष नगर असा 1.26 किमीचा सहा पदरी हा उड्डाण पूल आहे. हा उड्डाण पूल 7 चौकांवरून जाणार आहे. दिंडोशी बसडेपो जवळ पादचारी पूल स्वयंचलित जिन्यासह प्रस्तावित आहे. गोरेगांव-मुलूंड जोडरस्ता प्रकल्प' (जीएमएलआर) हा महानगरपालिकेने हाती घेतलेला महत्त्वाचा प्रकल्प असून या जोडरस्त्याने मुंबई उपनगरातील पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा चौथा जोडरस्ता उपलब्ध होणार आहे. सदर जोडरस्त्याची लांबी १२.२ किलोमीटर असून पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व) येथील ओबेरोय मॉल ते पूर्व द्रुतगती मार्ग मुलूंड (पूर्व) येथील ऐरोली नाका चौकापर्यंत हा जोडरस्ता असणार आहे.
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, गोरेगांव-मुलूंड लिंक रोड हा पूर्व व पश्चिमेला जोडणारा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई, न्यूयॉर्कमध्ये वेळेला महत्व आहे. किती किमी अंतर आहे, त्यापेक्षा हे अंतर किती कमी वेळात पार केले जाईल याला महत्व आहे. पश्चिम उपनगरात लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे ईस्ट-वेस्ट कनेक्टिव्हिटीसाठी गोरेगाव मुलूंड लिंक रोड प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. या प्रकल्पात दोन्ही कडून रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे.
या प्रकल्पात सायकल ट्रॅक, फूटपाथ ही रस्त्यांवर असणार आहेत. येथे 4 किमीचा बोगदा केला जाईल, हा प्रकल्प रेकॉर्ड ब्रेकिंग वेळेत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, गोरेगाव मुलूंड जोड रस्त्यामुळे जसा मुंबईतील नागरिकांना फायदा होणार आहे, तसाच विदर्भ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या नागरिकांना देखील भविष्यात गाडी पकडण्यासाठी वळसा घालण्याची गरज पडणार नाही व तुलनेने कमी वेळात आपल्या गावी पोहोचता येईल.
आमदार सुनील प्रभू यांनी गेल्या काही वर्षात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतानाच त्यामुळे नागरिकांना उपलब्ध झालेल्या विविध सेवा-सुविधांचा आवर्जून उल्लेख केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळेच दिंडोशीचा विकास शक्य झाला. येथील म्हाडाच्या भूखंडावर ऑलिम्पिकच्या धर्तीवर जलतरण तलाव बांधण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी आमदार रवींद्र वायकर, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू, माजी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, महिला विभागसंघटक व माजी नगरसेविका साधना माने, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, पालिका उपायुक्त परिमंडळ 4 विजय बालमवार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, पी दक्षिण वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे व इतर मान्यवर उपस्थित होते