

मुंबई (Mumbai): वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील दैनंदिन रस्ते सफाई, गटार स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाची कामे गेल्या वर्षभरापासून 'टेंडरच्या चक्रव्यूहात' अडकली आहेत. त्यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला असून, नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे प्रश्न गंभीर बनले आहेत.
महापालिकेने कचरा व्यवस्थापनाचे काम पाच वर्षांसाठी कंत्राटदारांना देण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र ही प्रक्रिया पूर्णत्वास जात नसल्याचे निदर्शनास येते. सुमारे एक हजार कोटी रुपयांचे हे कंत्राट आहे.
पहिले टेंडर (ऑक्टोबर २०२४): सर्वप्रथम ३ वर्षांसाठी काढलेले टेंडर कंत्राटदारांनी दिलेल्या कमी दरांमुळे महापालिका, कंत्राटदार आणि सल्लागार यांच्यात एकमत न झाल्याने रद्द करावी लागली.
दुसरे टेंडर (मे २०२५): दुसऱ्यांदा ई-टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली, पण यावेळी 'प्रशासकीय अडचणीं'चे कारण देत ही टेंडरही रद्द करण्यात आली.
तिसरे टेंडर (सप्टेंबर २०२५ पासून): इतर महापालिकांच्या पद्धतींचा अभ्यास करून तिसऱ्यांदा टेंडर काढण्यात आली, मात्र यावेळीही अडचणींचा ससेमिरा सुरूच आहे.
सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या टेंडर प्रक्रियेत कंत्राटदारांना मोठी अडचण येत आहे. महापालिकेने अनामत रक्कम डिमांड ड्राफ्ट द्वारे भरण्यास सांगितल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. यामुळे ११ नोव्हेंबर रोजी उघडण्यात येणाऱ्या टेंडरची मुदत आता पुन्हा एकदा १४ नोव्हेंबरपर्यंत वाढवावी लागली आहे.
यापूर्वी कंत्राटदारांना कमी वेळ मिळाल्याच्या कारणास्तव ४ नोव्हेंबरची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. वर्षभरात तिसऱ्यांदा प्रक्रिया सुरू असूनही केवळ तांत्रिक कारणे आणि मुदतवाढीमुळे ही प्रक्रिया लटकली आहे.
एकीकडे महापालिकेकडून दररोज शहर स्वच्छ केल्याचा दावा केला जात असला तरी, दुसरीकडे शहरातील अनेक भागांत जागोजागी कचऱ्याचे ढिगारे जमा होत आहेत. वेळेत कचरा वर्गीकरण आणि संकलन न झाल्यामुळे शहरात अस्वच्छता पसरत आहे.
वृक्ष छाटणीनंतर निघालेला कचराही वेळेत उचलला जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेने टेंडर प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी लवकर दूर करून, लवकरात लवकर सक्षम कंत्राटदाराची नेमणूक करावी, जेणेकरून शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळू शकेल, अशी मागणी आता जोर धरत आहे.