
मुंबई (Mumbai) : केंद्र सरकारने तीन रेल्वे मार्गांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी ७,९२७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील दोन रेल्वे मार्गांचा समावेश आहे. महाराष्ट्रासह तीन राज्यातील सात जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गामुळे रेल्वेचे जाळे ६३९ किलोमीटरने वाढणार आहे. येत्या ४ वर्षात हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत.
रेल्वे खात्याने मंजुरी दिलेल्या तीन प्रकल्पांमध्ये जळगाव मनमाड चौथा रेल्वे मार्ग १६० किलोमीटर, भुसावळ ते खंडवा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग १३१ किलोमीटर आणि प्रयागराज माणिकपूर तिसरा रेल्वे मार्ग ८४ किलोमीटर या प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थाक धर्मेंद्र मीना यांनी दिली. मनमाड ते जळगावदरम्यान 160 किमी लांबीची चौथी रेल्वे मार्गिका टाकली जाणार आहे. यावर 2773 कोटी रुपये खर्च येणार आहे. भुसावळ ते खंडवा या मार्गावर 131 किमी लांबीची तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका टाकली जाणार आहे. यावर 3514 कोटी रुपये खर्च येणार आहे.
या रेल्वे मार्गांना मंजुरी मिळाल्यामुळे, या मार्गावरून होणाऱ्या माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूकीला चालना मिळणार आहे. तसंच या मार्गांवरच्या प्रवासी गाड्यांची संख्याही वाढणार आहे. यामुळे स्थानिक रोजगार निर्मिती आणि पर्यटन स्थळांना चालना मिळणार असल्याची माहिती मीना यांनी दिली. महाराष्ट्रासह तीन राज्यातील सात जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गामुळं रेल्वेचे जाळे 639 किलोमीटरने वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मालाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासोबतच मुंबई-प्रयागराज मार्गावरील गर्दी कमी होणार असल्याचा दावा केला जात आहे.
प्रस्तावित मुंबई-प्रयागराज-वाराणसी मार्गावर अतिरिक्त प्रवासी गाड्या चालवण्यासाठी कनेक्टिव्हीटी वाढवणार आहे. तसंच, याचा फायदा नाशिक (त्र्यंबकेश्वर), खंडवा (ओंकारेश्वर), आणि वाराणसी (काशी विश्वनाथ) येथील ज्योतिर्लिंगांना जाणाऱ्या यात्रेकरूंना तर होईलच पण त्याचबरोबर प्रयागराज, चित्रकूट, गया आणि शिर्डी येथील धार्मिक स्थळांवरील पर्यटनदेखील वाढणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळ असलेले अंजठा-एलोरा, देवगिरी किल्ला, रेवा किल्ला, यावळ अभयारण्य, केवोती धबधबा, असीरगड किल्ला यासारख्या विविध आकर्षणाचे केंद्र असलेल्या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळणार आहे.