
मुंबई (Mumbai) : ठेकेदाराने (Contractor) निकृष्ट दर्जाचे काम केल्यास त्याला सहा महिने टेंडर भरता येणार नाही, असे धोरण सरकारने तयार केले असून, अधिकाऱ्यांवरही विशेष कारवाई केली जाईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली.
लोकसभेतील राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे नेते आणि नागौरचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या बांधकामातील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केला होता. या एक्सप्रेस-वेवर 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात एकट्या दौसामध्ये 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एक्स्प्रेस वेवर तैनात असलेल्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईची आणि चौकशी अहवालाबाबत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडून माहिती मागवली होती.
मंत्री नितीन गडकरी यांनी हनुमान बेनिवाल यांच्या प्रश्नांना सभागृहात सविस्तर उत्तर दिले. गडकरी म्हणाले, हा देशातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग असून, जागतिक स्तरावर सर्वात कमी वेळेत बांधण्यात आला आहे. त्याची किंमत एक लाख कोटी रुपये आहे. थरामध्ये फरक आहे, हा थर काही ठिकाणी नक्कीच दबला गेल्याचे समोर आले आहे. आम्ही तो दुरुस्त करण्यासही सांगितले होते आणि ती दुरुस्ती करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी थरात तफावत आढळून आली आहे, त्यासाठी आम्ही ४ कंत्राटदारांना जबाबदार धरले असून, त्यांना नोटीस देऊन कडक कारवाई करू. तसेच अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.
गडकरी म्हणाले, ठेकेदाराने असे निकृष्ट दर्जाचे काम केल्यास त्याला सहा महिने टेंडर भरता येणार नाही, असे धोरण आम्ही तयार केले असून, अधिकाऱ्यांवरही विशेष कारवाई करून त्यांना कामावरून निलंबित केले जाईल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विभागाने ५० लाख कोटींची कामे केली आहेत. कंत्राटासाठी कोणत्याही ठेकेदाराला मंत्रालयात यावे लागले नाही. आम्ही पारदर्शक आहोत, डेडलाईनसाठी वचनबद्ध आहोत आणि आम्हाला निकाल हवे आहेत. ठेकेदाराने कामे न केल्यास त्याला बुलडोझर खाली टाकू, असे मी जाहीर सभेत सांगितले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेत रस्ते अपघातांच्या आकडेवारीवरही गडकरींनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, सर्व प्रयत्न करूनही वर्षभरात देशात १.६८ लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 60 टक्के तरुण होते. ही परिस्थिती खेदजनक असून ती रोखण्यासाठी सर्वांना सहकार्य करावे लागेल, असे त्यांनी सभागृहात सांगितले.