
मुंबई (Mumbai) : कल्याणमध्ये रस्त्यावरील खड्डे अचूक मोजून दाखविणाऱ्यास ५१ हजाराचे प्रथम, ४१ हजाराचे द्वितीय आणि ३१ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक दिले जाईल अशी घोषणा राष्ट्रवादीचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष विश्वास आव्हाड यांनी केली आहे.
कल्याण डोंबिवलीत रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरले जाणार असा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. महापालिका प्रशासनाचा दावा फेल ठरला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी देखील चौकशी करुन दोषींच्या विरोधात नक्कीच कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे हे रजेवर असल्याने महापालिका आयुक्त पदाचा प्रभारी पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. त्यांनी यासंदर्भात बैठक घेतली. आयुक्तानंतर जिल्हाधिकारी यांनी देखील कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे विश्वास आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसोबत कल्याण पूर्व परिसरात रस्त्यांची पाहणी केली. ढाेल ताशे वाजवित त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, जो कोणी रस्त्यावरील खड्डे अचूक मोजून दाखवेल त्याला ५१ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक दिले जाईल. तसेच दुसरे पारिषिक ४१ हजार आणि तिसरे पारितोषिक ३१ हजार रुपये दिले जाईल. श्रीकांत शिंदे हे दोन वेळा कल्याणचे खासदार, गणपत गायकवाड हे तीन वेळा आमदार, मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे तरी पण कल्याण पूर्वेला सावत्र वागणूक का मिळतेय असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांनी कल्याण पूर्वेच्या विकासाकडे लक्ष द्यावे असे आवाहन राष्ट्रवादीने केले आहे.
दरम्यान, कल्याण पूर्वेतील एका विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजप आमदार गणपत गायकवाड यांना रस्त्यावरील खड्डयांवर प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, खड्डे बुजविण्याचे आश्वासन सर्वच लोक देत आहेत. रस्त्यात खडडे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती आहे. कचरा, रस्त्यावरील खड्डे याचा नागरिकांना नेहमीच त्रास होतो. अनेक ठिकाणी रस्ते नव्याने करुन देखील त्याठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्यांमुळे नागरिकांना मानेचा आणि कंबरेचा त्रास होऊन गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे टेंडर प्रक्रियेत बदल करणे गरजेचे आहे, असे सांगत रस्त्यांमधील खड्ड्यांचे खापर टेंडर प्रक्रियेवर फोडले.