
मुंबई (Mumbai): महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी MSRDC) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाशेजारी (Mumbai Pune Expressway) धरणाचे काम काढले आहे. शेजारील पनवेल, खालापूर किंवा कर्जत या तालुक्यात जागेचा शोध घेऊन धरणाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी एमएसआरडीसीने नुकतेच टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे.
एमएसआरडीसीकडून मुंबई-पुणे प्रवास अंतर कमी करण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बांधण्यात आला आहे. या महामार्गालगतच्या पनवेल, खालापूर आणि कर्जत तालुक्यातील एकूण १०२ गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली आहे.
विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून या गावांच्या विकासाची जबाबदारी एमएसआरडीसीवर आहे. त्यानुसार या गावांच्या विकास आराखड्यात एमएसआरडीसीकडून धरण प्रस्तावित करण्यात आले आहे. मागील काही वर्षात या गावांतील लोकसंख्या वाढली असून भविष्यात ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अशावेळी त्या गावांना अपुरा पाणी पुरवठा होत असून येत्या काळात तेथील पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार धरण प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे.
एमएसआरडीसीने खालापूर, पनवेल वा कर्जत येथे जागा शोधण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकी जागा कुठे असेल हे निश्चित करून या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास, सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
दोन महिन्यांत सल्लागार नियुक्त करून पुढील प्रक्रिया पूर्ण करत तात्काळ अभ्यासास सुरवात करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार कंपनीला एका वर्षाचा कालावधी दिला जाणार आहे.