

मुंबई (Mumbai): मुंबईकरांना पावसाळ्यापूर्वी दिलासा देण्याऐवजी भाजप आणि सत्ताधारी पक्षाकडून नाले सफाई पाहणीच्या नावाखाली केवळ इव्हेंटबाजी, फोटोबाजी आणि दिखाऊ दौरे सुरू आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षप्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केली.
काल भाजप मुंबई अध्यक्षांचा तब्बल ३० ते ३५ गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणी दौरा झाला. मात्र अनेक वर्षे नालेसफाईच्या गाड्या मोजण्याचे राजकारण करणारे किरीट सोमय्या या दौऱ्यात कुठेच दिसले नाहीत. मुंबईकर आता विचारत आहेत “गाड्या वाढल्या म्हणून मोजणी बंद झाली का? असा खोचक सवाल त्यांनी केला.
सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे नालेसफाई पाहण्यासाठी आले होते की मुंबईत नवीन जमिनी शोधण्यासाठी, असा सवालही मुंबईकरांच्या मनात निर्माण झाला आहे. कारण नाले कमी आणि जमीन जास्त पाहिली जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. महापालिका प्रशासन ७० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करत आहे. पण प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांचेच नगरसेवक आणि इतर पक्षांचे स्थानिक प्रतिनिधी प्रशासनाची पोलखोल करत आहेत.
मनसेचे गटनेते स्पष्ट सांगतात की त्यांच्या विभागात १० टक्केही काम झालेले नाही. कुर्ला विभागातील नगरसेविका मिठी नदीची कोणतीही साफसफाई झालेली नसल्याचे सांगतात. चांदिवलीतील भाजपचेच नगरसेवक म्हणतात की त्यांच्या विभागात नालेसफाई झालीच नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो की हा ७० टक्क्यांचा आकडा आला कुठून? नाले साफ झाले की फक्त कागद साफ झाले? काम कमी आणि बिलं भारी, मुंबई बुडाली तरी कंत्राटदार सुखी!, अशी टीकाही त्यांनी केली.
आज परिस्थिती अशी झाली आहे की सत्ताधाऱ्यांमध्येच तुझे माझे जमेना, मुंबई मात्र तुंबेना अशी अवस्था निर्माण झाली आहे. एकीकडे भाजपचेच नगरसेवक प्रशासनावर आरोप करत आहेत, तर दुसरीकडे मंत्री वेगळी भाषा बोलत आहेत. म्हणजे सरकारमध्ये समन्वय नाही, फक्त प्रसिद्धीची स्पर्धा सुरू आहे. मुंबईकरांना ताफे नकोत, तर स्वच्छ नाले हवे आहेत. मुंबईकरांना फोटोसेशन नकोत, तर पावसात सुरक्षित रस्ते हवे आहेत. मुंबईकरांना जाहिरातबाजी नको, तर प्रत्यक्ष काम हवे आहे.
ही नालेसफाई नसून फोटोसफाई आहे. ही पाहणी नसून पीआरची गाडी आहे. नाले चोकअप… पण सरकारचा मेकअप.. विविध माध्यमांमधून नालेसफाईच्या कामांचे आकडे फसवे असल्याचे समोर आले आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनीच प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
पहिल्याच पावसात जर मुंबई तुंबली, लोकांच्या घरात पाणी शिरले, लोकल सेवा विस्कळीत झाली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही सत्ताधाऱ्यांची आणि महापालिका प्रशासनाची असेल, असा इशारा अमोल मातेले यांनी दिला आहे.