Mumbai : नाल्यात टाकण्यात येणारा कचरा रोखण्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय
मुंबई (Mumbai) : वांद्रे पूर्वसह इतर काही ठिकाणी करण्यात आलेला प्रयोग यशस्वी झाल्यामुळे मुंबईतील सर्व महत्त्वाचे नाले आता मजबूत प्लॅस्टिक आवरण, लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त करण्यात येणार आहेत. नाल्यात टाकण्यात येणारा कचरा रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अनेक प्रयत्न सुरु आहेत. पावसाळ्यात नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागू नये यासाठी व्यापक प्रमाणात नालेसफाई करण्यात येते, मात्र मार्चपासून नालेसफाई झाल्यामुळे पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये गाळ साचतो. यामध्ये रहिवाशांकडून नाल्यात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे नालेसफाई झाल्यानंतरही नाले तुंबण्याचे प्रकार घडतात. याला आळा घालण्यासाठी नाल्यात कचरा टाकताना आढळल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. आता हे नाले बंदिस्त करून नाल्यात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला आळा घालण्यात येणार आहे.
वांद्रे येथील पी अॅण्ड टी कॉलनी नाल्याशेजारी 10 फूट उंच जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. या ठिकाणी जाळ्या बसविण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून अन्य ठिकाणी नाल्याशेजारी जाळ्या बसवण्यात येतील. तसेच नाल्याशेजारी कचरा फेकणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार असून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईचा निर्णयही घेण्यात आला आहे.
मुंबईतील नाले
छोटे नाले - 1508 (लांबी 605 किमी)
मोठे नाले - 309 (लांबी 290 किमी)