मुंबई (Mumbai) : मुंबईत नालेसफाईची कामे सध्या युद्धपातळीवर सुरु आहेत. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्धिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ८६ हजार ३७८ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्धिष्टाच्या ४७.६० टक्के गाळ काढण्यात यश आल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे. तसेच काम सुरु होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरु असताना आणि काम संपल्यानंतर अशा तिन्ही टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअलटाईम जिओ टॅग) यासह चित्रफित व छायाचित्रे तयार करुन ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आले आहे.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या वतीने पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी मदत मिळते. पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करुन गाळ उपशाचे उद्धिष्ट निश्चित केले जाते. मुंबईतील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्धिष्ट ठरविले जाते. त्यानुसार, यंदा १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्धिष्ट ठरविण्यात आले आहे. पैकी, आतापर्यंत (२१ एप्रिल २०२४) ४ लाख ८६ हजार ३७८ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्धिष्टाच्या ४७.६० टक्के गाळ काढण्यात आला आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात यंदाही कामे सुरु झाल्यानंतर वेगाने सर्व कामे पूर्ण करण्यात येत आहेत. गाळ काढण्याची ही सर्व कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावीत, आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार, शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये कामे जलदगतीने करण्यात येत आहेत. नाल्यांमधून उद्धिष्टाएवढे किंवा त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम ३१ मे २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीत ही कामे पूर्ण होतील, असा प्रशासनाला विश्वास आहे. त्यादृष्टीने नियोजन करून संपूर्ण यंत्रणेने कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
काम सुरु होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरु असताना आणि काम संपल्यानंतर अशा तिन्ही टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअलटाईम जिओ टॅग) यासह चित्रफित व छायाचित्रे तयार करुन ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. असे छायाचित्रण व चित्रफित तयार करताना दररोज नाल्यांमधून गाळ काढल्यानंतर तो ठेवल्याची जागा, नाल्याकाठची दैनंदिन छायाचित्रे, गाळ डंपरमध्ये भरण्यापूर्वी डंपर पूर्ण रिकामा असल्याचे दर्शविणारे चित्रण, डंपरमध्ये गाळ भरताना आणि भरल्यानंतरचे चित्रण, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर आलेल्या व जाणाऱ्या डंपर वाहनांच्या क्रमांकाची तसेच वेळेची नोंद करणे, क्षेपणभूमीवर येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे ही सर्व जबाबदारी कंत्राटदारांकडून करुन घेण्यात येत आहे.