
मुंबई (Mumbai) : मुंबई शहर व पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण होण्यासाठी आणखी ३ वर्षे लागण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ४०० किलोमीटर तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी पहिला टप्पा २०२५ पर्यंत व दुसरा टप्पा २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्धिष्ट महापालिकेचे आहे. त्यासाठी दररोज एक किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आलेल्या आहेत.
मुंबईतील दोन हजार किमी रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने काँक्रीटीकरण केले जात आहे. यापैकी पन्नास टक्के रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील तब्बल ६,०७८ कोटींच्या कामांसाठी टेंडर मागवण्यात आले. त्यातून पाच बलाढ्य कंत्राटदारांची निवड करून जानेवारी २०२३मध्ये कार्यादेश देण्यात आले. मात्र शहर भागातील रस्त्यांची कामे ऑक्टोबरमध्ये सुरू झाली. तर पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील कामांची गती कमी आहे.
गेल्या दोन वर्षांत पहिल्या टप्प्यातील ४०० किमी रस्त्यांपैकी केवळ ३० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठीही टेंडर मागवून ऑगस्ट२०२४ मध्ये कार्यादेश देण्यात आले. पहिल्या टप्प्यातील ३९२ किलोमीटर लांब रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण ऑक्टोबरपासून सुरू झाले. पहिल्या टप्प्यातील कामांचा कालावधी २०२६ पर्यंत होता. तर दुसऱ्या टप्प्यातील कामांचा कालावधी २०२८पर्यंत आहे. मात्र पहिला टप्पा २०२५ पर्यंत व दुसरा टप्पा २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्धिष्ट महापालिकेचे आहे. पहिल्या टप्प्यातील कामे ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्धिष्ट आहे. त्यासाठी दररोज किमान एक किमीचा रस्ता पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदारांना दिलेल्या आहेत. दर आठवड्याला कामाचा आढावा घेतला जात आहे. गेल्या वर्षी ज्या रस्त्यांवर खड्डे होते ते रस्ते प्राधान्याने हाती घेतले जाणार आहेत. रस्त्याची कामे एकाचवेळी सुरू असल्यामुळे वाहतूक पोलिसांची परवानगी, उपयोगिता वाहिन्या सरकवणे, रस्ते बांधणीपूर्वीची पर्जन्य जलवाहिन्यांची कामे यामुळे वेळ लागत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.