Mumbai Metro 14: खासगी कंत्राटदारांनी फिरवली पाठ; आता कर्ज काढून ईपीसी तत्त्वावर धावणार बदलापूर मेट्रो

पहिल्या टप्प्यात शीळफाटा ते बदलापूर असा २५ किमीचा मार्ग उभारणार; पीपीपी मॉडेल अपयशी ठरल्याने कर्ज काढून ईपीसी तत्त्वावर कामाची तयारी
Badlapur To Navi Mumbai Railway line
Badlapur To Navi Mumbai Railway lineTendernama
Published on

मुंबई (Mumbai): कांजूरमार्ग ते बदलापूर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो १४ मार्गिकेच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या या महाकाय प्रकल्पाचे काम आता दोन टप्प्यांत केले जाणार आहे. पूर्वी हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी म्हणजेच पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येणार होता, मात्र कंत्राटदार कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे आता प्राधिकरणाने स्वतः कर्ज घेऊन ईपीसी म्हणजेच इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन मॉडेलवर या मेट्रोची उभारणी करण्याचा मार्ग निवडला आहे.

Badlapur To Navi Mumbai Railway line
Pune Metro Line 3: आयटी हबची कोंडी फुटणार! 'या' दिवसापासून हिंजवडी ते बालेवाडी प्रवास होणार सुखाचा

बदलापूर, शीळफाटा, महापे, घणसोली आणि निळजे या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांना थेट मुंबई शहराशी जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली मेट्रो १४ मार्गिका आता नव्या स्वरूपात आकारास येणार आहे. सुमारे ४३.६९ किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गासाठी एमएमआरडीएने यापूर्वी पीपीपी तत्त्वावर स्वारस्य टेंडर मागवले होते. मात्र, १८ हजार कोटी रुपयांच्या या महाकाय प्रकल्पात खासगी भागीदारांनी स्वारस्य न दाखवल्यामुळे जुनी टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची वेळ प्राधिकरणावर आली होती. या पार्श्वभूमीवर, प्रकल्पाला गती देण्यासाठी प्राधिकरणाने कर्ज उभारून थेट स्वतःच्या देखरेखीखाली ईपीसी तत्त्वावर काम सुरू करण्याचे ठरवले आहे.

पहिल्या टप्प्यात २५ किलोमीटरची मार्गिका
नव्या नियोजनानुसार, या प्रकल्पाची विभागणी दोन टप्प्यांत करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शीळफाटा ते बदलापूर दरम्यान सुमारे २५ किलोमीटर लांबीचा रस्ता उन्नत स्वरूपात बांधला जाणार आहे. हा मार्ग कल्याण ते शीळफाटा दरम्यान धावणाऱ्या मेट्रो १२ अ मार्गिकेला समांतर जाणार आहे. या दोन्ही मार्गिका जवळपास १० किलोमीटर अंतरापर्यंत समांतर धावणार असल्याने, या दोन्ही मार्गिकांचा हा १० किलोमीटरचा टप्पा एकत्रितपणे उभारता येईल का, याची तांत्रिक चाचपणी सध्या सुरू आहे. तसे झाल्यास वेळेची आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.

Badlapur To Navi Mumbai Railway line
Mumbai Water Metro: ट्राफिकची कटकट संपणार! मुंबईत धावणार हायटेक 'वॉटर मेट्रो'; 31 जलमार्ग 45 टर्मिनल्सचा मेगा प्लॅन

नव्याने होणार डीपीआर आणि प्रवाशांचा अभ्यास
मेट्रो १४ प्रकल्पाच्या कामासाठी तयार करण्यात आलेला आर्थिक सुसाध्यता अहवाल, सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर आणि प्रवासी संख्येच्या अंदाजाची नव्याने पडताळणी केली जाणार आहे. आधीच्या अहवालात राहिलेल्या त्रुटी दूर करणे आणि नव्या तांत्रिक शक्यतांचा अभ्यास करण्यासाठी विशेष सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे.

दुसऱ्या टप्प्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार
मेट्रो मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यात शीळफाटा ते कांजूरमार्ग दरम्यानच्या मार्गाची उभारणी केली जाईल. हा टप्पा अत्यंत आव्हानात्मक असणार आहे, कारण मेट्रो मार्गिका थेट ठाणे खाडीच्या खालून भुयारी पद्धतीने नेली जाणार आहे. तसेच या संपूर्ण पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर खाडी आणि संरक्षित कांदळवनाचे क्षेत्र येत असल्याने विविध परवानग्या मिळवणे आणि बांधकाम करणे कठीण ठरणार आहे. त्यामुळे कांजूरमार्ग जोडणीसाठी मुंबईकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Badlapur To Navi Mumbai Railway line
Mumbai Metro-12: ऑरेंज लाईनचे काम मिशन मोडवर

Key Points Summary

  • कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो १४ या १८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची उभारणी आता दोन टप्प्यांत होणार.

  • कंत्राटदार कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे जुनी पीपीपी स्वारस्य टेंडर प्रक्रिया रद्द; आता ईपीसी तत्त्वावर काम सुरू करणार.

  • पहिल्या टप्प्यात शीळफाटा ते बदलापूर दरम्यान २५ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधणार.

  • प्रकल्पाचा डीपीआर आणि प्रवासी संख्येच्या नव्याने पडताळणीसाठी विशेष सल्लागाराची नियुक्ती अंतिम टप्प्यात.

  • मेट्रो १२ अ आणि मेट्रो १४ चा समांतर असणारा १० किलोमीटरचा मार्ग एकत्रित बांधण्याची चाचपणी सुरू.

  • दुसऱ्या टप्प्यातील कांजूरमार्ग जोडणी ठाणे खाडीखालून व कांदळवनातून जाणार असल्याने या टप्प्याला मोठा विलंब होणार.

Tendernama
www.tendernama.com