
मुंबई (Mumbai) : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा बहुप्रतिक्षित पायाभूत सुविधा प्रकल्प, ठाणे खाडी पूल-३ पूर्ण झाला आहे, परंतु महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने त्याचे अधिकृत उद्घाटन रखडले आहे. पूर्णपणे खुला झाल्यानंतर या पुलावरून दररोज सुमारे २ लाख वाहने ये-जा करु शकतात.
पुणे ते मुंबई जोडणाऱ्या ५५९ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा दक्षिणेकडील भाग सुरुवातीला १ मे, महाराष्ट्र दिनी उघडण्याचे नियोजन होते. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुलाचा उत्तरेकडील भाग (मुंबई ते पुणे) खुला केला होता. यामुळे एका दिशेने होणारी गर्दी कमी होण्यास मदत झाली असली तरी, प्रवासी आता कॉरिडॉर पूर्णपणे कार्यान्वित होण्याची वाट पाहत आहेत. उत्तरेकडे जाणाऱ्या पुलामुळे त्या दिशेने वाहतूक सुलभ झाली आहे. दक्षिणेकडे जाणाऱ्या (पुणे ते मुंबई), पुलामुळे संपूर्ण १२-लेन कॉरिडॉर कार्यान्वित होईल. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, ठाणे खाडी पूल-३ मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानची वाहतूक सुलभ करणारा महत्त्वाचा पूल ठरेल.
१.८ किमी लांबीच्या या पुलाची कल्पना पहिल्यांदा २०१२ मध्ये मांडण्यात आली होती परंतु पर्यावरणीय मंजुरी मिळण्यास लागणारा वेळ यामुळे हा प्रकल्प काही वर्षे रखडला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी २०२० मध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. २०१८ मध्येच लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) ला बांधकाम कंत्राट देण्यात आले होते आणि त्यासाठी ३६ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. तथापि, कोविड साथीमुळे आणि लॉजिस्टिक्सच्या समस्यांमुळे ते पुन्हा विस्कळीत झाले. पूर्णपणे खुला झाल्यानंतर या पुलावरून दररोज सुमारे २ लाख वाहने ये-जा करु शकतात. या पुलामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड म्हणाले, "आम्ही तांत्रिकदृष्ट्या तयार आहोत, परंतु काही चाचण्या अजूनही प्रलंबित आहेत. एकदा त्या मंजूर झाल्या आणि सरकारची मान्यता मिळाली की, उद्घाटनाचे निश्चित होईल."