मुंबई (Mumbai) : मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) कसारा घाटाचे काम निकृष्ट झाल्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. कसारा घाटातील तडे हे भूगर्भातील हालचालींमुळे झाल्याची भीतीही राज्य सरकारने व्यक्त केली आहे.
कसारा घाटात कोट्यवधी रुपये खर्च करून केलेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्यांची दुरवस्था झाल्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार संजय पोतनीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राज्य सरकारने सविस्तर माहिती दिली. जुन्या कसारा घाटात जुलै 2022 मध्ये रस्त्याच्या कडेला सुमारे 100 मीटर लांबीचे तडे आढळले. पण उर्वरित दोन पदरी रस्ता व्यवस्थित आहे. घाटातील रस्त्यावरील नैसर्गिक तड्यांची कारणे जाणून घेण्यासाठी आयआयटी मुंबई येथील भूगर्भ विषयातील प्राध्यापक आणि इतर तज्ञांची नियुक्ती केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी-सिन्नर जंक्शनला केंद्रीय रस्ता मंत्रालयाने ब्लॅकस्पॉट म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे तेथे उड्डाणपूल व भुयारी मार्ग बांधण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सुद्धा सरकारच्यावतीने देण्यात आली.
कसारा घाटात २ वर्षापूर्वीच्या पावसाळ्यात कसारा जुना घाट व नवीन घाटातील दोन्ही मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात रस्ता खचला होता. परिणामी काही दिवस महामार्गावरिल वाहतूक एकेरी मार्गाने सुरु ठेवण्यात आली होती. यानंतर पावसाळा संपल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोलप्लाझा कंपनीने एका ठेकेदारामार्फत कोट्यवधी रुपये खर्चून तडा गेलेला रस्ता व खचलेल्या भागाची दुरुस्ती करून घेतली. परंतु हे काम निकृष्ट झाल्याची चर्चा आहे. त्यातच यंदा आठवड्याभराच्या पावसामुळे १६ जुलै २०२२ रोजी जुन्या कसारा घाटात रस्त्याला मोठे तडे गेल्याचे समोर आले. विशेष म्हणजे मागील वर्षी ज्या ठिकाणी रस्त्याला तडे गेले होते व खचले होते त्याच ठिकाणी रस्त्याला अर्धा किमी मीटरपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत.
रस्त्याच्या कडेला सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेले संरक्षण कठडे सुद्धा एक ते दीड फुट खाली दबले गेले आहेत. तर काही कठडे पडले आहेत. दरम्यान जुन्या कसारा घाटातील रस्यावरील तडे मोठ्या प्रमाणात वाढत असून घाटातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे तर आणखीनच रस्ता खचण्याची शक्यता आहे. जुन्या कसारा घाटात रहदारी मोठ्या प्रमाणात असते. त्यातच अर्धा किमी मीटरचा रस्ता खचला आहे. अनेक मोठ्या भेगा या रस्त्यावर पडल्या आहेत. दरम्यान पावसाचे पाणी रस्त्यावर पडलेल्या भेगा व तडे यात जात असून यामुळे भराव खचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच तुटलेले संरक्षक कठडे, रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे धोकादायक आहेत.