
मुंबई (Mumbai): पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी, पूरस्थिती तसेच पिण्याच्या पाण्यासह सर्व समस्या सोडविण्यासाठी पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा, पुणे महानगर विकास प्राधिकरण (PMRDA) आणि एमआयडीसीने (MIDC) योग्य समन्वयाने नियोजन करावे. उपलब्ध संसाधनाद्वारे नागरिकांना चांगली सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. समस्यांवर तोडगा काढून कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी बृहत आराखडा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.
१५ दिवसांत निर्णय घ्या
हिंजवडी आयटी पार्कमधील विविध समस्यांबाबत विधानभवनमध्ये आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीमुळे हजारो आयटी अभियंते, नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात वाहतूक कोंडीत भर पडते. ही समस्या सोडविण्यासाठी या भागांत रस्ते, रिंगरोड, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग यंत्रणा, मेट्रोची प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या.
कस्पटेवस्ती ते हिंजवडी फेज ३ पर्यंतचा रस्ता वेगळा केल्यास वाहतूक कोंडी कमी होईल, सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करावेत. म्हाळुंगे आयटी सीटीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा. रस्ते रुंदीकरणासाठी योग्य मोबदला देवून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून भूसंपादन करावे. हिंजवडी एलिव्हेटेड मार्गाचे काम सहा पदरी करून याबाबत १५ दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
रस्ता रुंदीकरणाच्या कामांना प्राधान्य द्या
सूर्या हॉस्पिटल ते माण गावठाण, म्हाळुंग ते हिंजवडी फेज एक, शनी मंदिर वाकड ते मरुंजी, नांदे ते माण या रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामाला संबंधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. शिवाजीनगर ते हिंजवडी कॉरिडॉरचा आराखडा तयार करावा.
वाकड-बालेवाडी भागात सार्वजनिक वाहतूक केंद्र उभारावे, यामुळे प्रवासी विभागले जावून गर्दी नियंत्रणात राहील. रस्त्यावरील गर्दी रोखता येईल. यासाठी फूटपाथचा विषयी दोन्ही मनपाने प्राधान्याने मार्गी लावावा. पाटील वस्ती ते बालेवाडी रोड येथील भूसंपादनाबाबत महिनाभरात काम करावे, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले.
पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य प्रवाहासाठी नियोजन करावे. त्याठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याची कामे हाती घ्यावीत. सर्व कामांसाठी विभागीय आयुक्त यांनी समन्वय करून बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मेट्रोचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करा
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम झाली तर हिंजवडी परिसरातील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी मेट्रोची कामेही त्वरित होणे आवश्यक आहे. मेट्रो स्टेशनची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
मेट्रो लॅंडिंगमुळे रस्ता छोटा होईल, यासाठी एमआयडीसी, पीएमआरडीए, मेट्रो यांनी एकत्र समन्वयाने विषय मार्गी लावावा, असे निर्देशही पवार यांनी दिले. पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
मंत्री, आमदारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार शंकर जगताप, शंकर मांडेकर, महेश लांडगे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, प्रधान सचिव गोविंदराज, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उद्योग विकास आयुक्त पी. वेलारासू यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, हिंजवडी येथील रहिवासी उपस्थित होते.