
मुंबई (Mumbai) : मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि विकासाचे माहेर असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे राज्याचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. तसेच ३ लाख कोटींपेक्षा जास्त किंमतीची कामे सुरू असणारे हे देशातील एकमेव प्राधिकरण आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी कौतुक केले.
येथील वांद्रे कुर्ला संकुल येथील कन्व्हेशन सेंटर येथे ‘एमएमआरडीए’ च्या ५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील जनतेला मिळालेल्या सोयी सुविधांचा उत्सव म्हणजे आजचा उत्सव विकासाचा ही संकल्पना असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, वेगवान आणि गतिमान विकासाचे शिल्पकार असलेल्या ‘एमएमआरडीए’च्या टीमचे अभिनंदन करतो. विकास, वारसा आणि संस्कृती यांचा उत्तम मिलाफ ‘एमएमआरडीए’ मध्ये पहायला मिळतो. पुढील पिढीला या विकासाची फळे चाखायला मिळणार आहेत. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याच्या विकासात प्राधिकरणाचा मोठा वाटा आहे. साडेसहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात आणि साडेतीन कोटी लोकसंख्या असलेल्या परिसराचा विकास प्राधिकरण करत आहे. सल्लागार म्हणून स्थापन झालेली ही संस्था आज वेगाने विकासकामे करत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ३ लाख कोटी पेक्षा जास्त किमतीची कामे सुरू असणारे हे देशातील एकमेव प्राधिकरण आहे. राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन करण्याचा उद्देश आहे. पण एकट्या ‘एमएमआरडीए’ क्षेत्रात दीड ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे सामर्थ्य आहे. जगाचे आर्थिक केंद्र होण्याचे क्षमता महानगर प्राधिकरण क्षेत्रात आहे. ही क्षमता निर्माण करणारे प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन करतो. राज्य आज थेट परकीय गुंतवणुकीच्या क्षेत्रात क्रमांक एकवर असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दावोस येथे आतापर्यंतच्या गुंतवणुकीचे सर्व रेकॉर्ड तोडले जातील असा विश्वास आहे. लोकांच्यासाठी शासन काम करत आहे. लोकांना सर्व सोयीसुविधा देणे यासाठी शासन काम करत आहे. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आता ‘एमएमआरडीए’, महापालिका, सिडको, म्हाडा यांच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे प्रकल्प लवकर पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.श्री शेलार म्हणाले की, प्राधिकरणाने ५० वर्षात मोठी झेप घेतली आहे. अशीच शतकी झेप घ्यावी अशा शुभेच्छा देतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे करणारी दुसरी संस्था नाही. कार्यक्रमास कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार राजन नाईक, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, आश्विन मुद्गल, सह महानगर आयुक्त राधा विनोद शर्मा उपस्थित होते.