
मुंबई (Mumbai) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेंतर्गत १३ लाख घरकुलांना मंजुरी देणे व मंजूर घरकुल लाभार्थ्यांना ४५० कोटी पहिला हफ्ता वितरित करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. योजनेला मिळालेल्या गतीमुळे १३,४६,५२२ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच १२,४३,००२ लाभार्थ्यांना १,९६९ कोटींचा पहिला हप्ता देण्यात आला आहे.
राज्यातील लाभार्थ्यांना त्यांच्या घरांचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी किमान १ लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवले गेले होते. प्रत्यक्षात १,०६,६८७ (१०६.७%) घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली आहेत. यामुळे लाखो गरजू कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. घरकुल बांधकामासाठी जागा मिळणे हा अनेक गरीब कुटुंबांसाठी मोठा अडथळा ठरत होता. त्यासाठी किमान ५००० लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती होऊन १३,३९२ (२६७.८%) लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता आणि गुणवत्ता आणण्यासाठी "महा आवास अभियान" राबविण्यात आले. १ जानेवारी २०२५ ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत विशेष उपक्रम राबवले गेले. या उपक्रमामुळे प्रशासनाला घरकुल मंजुरीपासून ते बांधकाम पूर्ण होईपर्यंतच्या सर्व टप्प्यांवर गतीमान निर्णय घेण्यास मदत होत असून, या योजनांमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी विविध प्रचार व जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत १,२०,००० रुपये प्रति घरकुल अनुदान देण्यात येते. त्याचप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत (९० दिवस अकुशल मनुष्यबळ) २८,०८० रुपये प्रति घरकुल व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय अनुदान १२,००० रुपये देण्यात येते. तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ व राज्य पुरस्कृत योजनांअंतर्गत ५०,००० अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय दि.०४ एप्रिल, २०२५ च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. त्यामुळे, हजारो कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. ग्रामविकास विभागाने ग्रामीण गृहनिर्माण योजनांसाठी राबविलेल्या १०० दिवसीय उद्दिष्टाची विहीत वेळेत १००% पूर्ती केली असून राज्य शासनाने ग्रामीण भागातील गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष अभियान राबवून निश्चित उद्धिष्टांपेक्षा अधिक यश मिळवले आहे.