Mumbai : 'बेस्ट' 10 लाख स्मार्ट वीज मीटर बसवणार; 1300 कोटींचे बजेट
मुंबई (Mumbai) : मुंबईत बेस्टच्या (BEST) वीज वितरण क्षेत्रात १० लाख वीज ग्राहकांच्या घरी, आस्थापनेच्या ठिकाणी येत्या काळात स्मार्ट मीटर्स बसवण्यात येणार आहेत. सुमारे १३०० कोटींचा खर्च यावर केला जाणार आहे. स्काडा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
बेस्ट उपक्रमाकडून मुंबईतील वीज वितरण क्षेत्रात मीटर बदलण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार मार्चपासून वॉर्डनिहाय या कामाला सुरुवात होईल. मुंबईतील निवासी, औद्योगिक, वाणिज्यिक तसेच झोपडपट्टी भागातील ग्राहकांचे मीटर या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून बदलण्यात येणार आहेत.
मुंबईत वीज वितरणाची जबाबदारी असणाऱ्या बेस्ट उपक्रमाकडून अदानी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार अदानी कंपनीच्या माध्यमातून तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डात हा मीटर बदलण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत काही ठिकाणी कंट्रोल रूमदेखील तयार करण्यात येतील. स्काडा तंत्रज्ञानाचा वापर करून हे स्मार्ट मीटरचे तंत्रज्ञान वापरात येईल. बेस्ट आणि अदानी यांच्यातील करारानुसार १३०० कोटी रुपये या कामांसाठी उपक्रमाकडून देण्यात येणार आहेत.
स्मार्ट मीटरच्या तंत्रज्ञानाने विजेची वितरण आणि वाणिज्यिक हानी कमी करणे शक्य होणार आहे. एखाद्या ग्राहकाचा वाढलेला किंवा कमी झालेला विजेचा वापर या तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रॕक करणे शक्य होईल. त्यामुळे वीज चोरीमुळे किंवा इतर कारणांमुळे होणारी विजेची गळती कमी होण्यासाठी मदत होईल. तसेच वीजचोरीच्या प्रकारालाही आळा बसेल. ग्राहकांनाही आपल्या वीज वापराचे ट्रॕकिंग मोबाईल एपच्या माध्यमातून करता येईल. त्यामुळेच विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होईल.
सुरूवातीला वॉर्डनिहाय रहिवासी सोसायटीच्या तसेच आस्थापनांच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बदलण्याचे काम केले जाईल. त्यानंतर झोपडपट्टी भागात या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या भागातील जागेची उपलब्धतचा तसेच देखभाल दुरुस्ती यासारखी आव्हाने असल्याचे उच्चपदस्थांनी सांगितले. परंतु वॉर्डात एकाचवेळी अनेक ठिकाणी कामे करणे शक्य होईल, त्यामुळे वर्षभरात १० लाख मीटर स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून बदलण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.