
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिकेने नारेगावसह चिकलठाणा, पडेगाव येथे पडून असलेल्या कचऱ्याची बायोमायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले आहे. कंत्राटदाराकडून नियमबाह्य पद्धतीने काम होत असल्याने महापालिकेने संबंधिताला दंडही लावला होता. त्यात मुंबईच्या आयआयटी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराच्या कामाची तपासणी केली. अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झालेला नसताना कंत्राटदार जीएनआय कंपनीला आठ कोटी रुपये देण्यात आल्याचे समोर आले आहे.
महापालिकेतर्फे अनेक वर्षे नारेगाव-मांडकी येथील कचरा डेपोवर शहरात निघणारा कचरा साठविला जात होतो. दरम्यान, चार ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आले. सध्या तीन केंद्रांवर दररोज प्रत्येकी १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. असे असले तरी नारेगावसह पडेगाव, चिकलठाणा येथे मोठ्या प्रमाणावर कचरा पडून होता. या कचऱ्याची बायोमायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (एसबीएम-२) अंतर्गत ६९ कोटी रुपयांची टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. हे काम गुजरातच्या कंपनीची सहकंपनी म्हणून जीएनआय कंपनीला दिले आहे.
या कंपनीला कार्यारंभ आदेश मिळताच कुठलीही प्रक्रिया न करता जेसीबीच्या मदतीने कचरा उचलून धुळे-सोलापूर हायवेलगत तसेच गांधेली भागातील खदानीत टाकण्यात आला. त्यानंतर महापालिकेने जीएनआय कंपनीला दंड लावून खदानीतील व हायवेवर टाकलेला कचरा परत आणावा, त्यावर प्रक्रिया करावी, असे आदेश दिले होते.
प्रकरण न्यायालयात जाऊनही....
कंत्राटदाराचे ‘कचरा फेक’ हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून तो नष्ट करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घ्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या कामाच्या तपासणीसाठी त्रयस्थ संस्था म्हणून मुंबईच्या आयआयटी संस्थेची नियुक्ती केली आहे. आयआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच कामाची पाहणी केली. या तपासणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असे असताना महापालिकेने कंत्राटदाराला ८ कोटी रुपयांचे बिल दिल्याचे सूत्रांनी सांगितले.