
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : राष्ट्रीय महामार्ग एनएच-५२ ते घारेगाव रस्त्यावर साखळी क्र. ४२०० मध्ये सुखना नदीवर मोठ्या निम्नजलशील पूल लांबून चकाचक दिसत असला तरी पुलावर प्रवेश करताच रस्त्यावर आरपार भेगा अन् सरफेस कुरतडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील कारभाऱ्यांनी तत्काळ खड्डे बुजवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. त्यात पुलावरील कार्पेट उखडुन भेगा पडल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तर पुलावरील रस्त्याच्या कडेला माती विखुरली आहे. विशेष म्हणजे, अनेक वेळा मातीवरून दुचाकी घसरून अपघात झाल्याचे प्रकार घडले आहे. पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे यापूर्वी किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात भरधाव येणाऱ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारभाऱ्यांनी तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग-एन एच-५२ ते घारेगाव रस्त्यावर सुखना नदीवर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतुन पुलाच्या १९५.५० मीटर लांबीतील बांधकामासाठी तीन कोटी ६६ लाख रूपये मंजुर करण्यात आले होते. याकामासाठी केंद्र सरकारच्या ग्रामीन विकास मंत्रालयामार्फत निधी वितरीत करण्यात आला होता. पुलाच्या बांधकामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील कार्यकारी अभियंता यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. चाळीसगावचे ठेकेदार बी. पी. पुन्शी यांना १ मार्च २०१३ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. त्यांनी अठरा महिन्यात या पुलाचे बांधकाम केले होते. बाॅक्ससेल पद्धतीने पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. लांबून पुलाचे काम चकचकीत दिसत असले तरी पुलाच्या लांबीत २० एमएम जाडीचा थर असलेला कारपेटला भेगा आणि खड्डे पडल्याने वाहने अडखळून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित ठेकेदाराचा पाच वर्षांचा दोष निवारण कालावधी संपल्याने त्याने आता दुरूस्तीस नकार दिला आहे. त्यामुळे पुलावरील रस्त्याच्या डागडुजीसाठी संबंधित विभागाने तातडीने टेंडर काढून काम करणे आवश्यक आहे.