
लातूर (Latur) : येथील औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) उभारलेल्या मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्यातून एक वर्षात बोगी तयार होऊन बाहेर पडेल, स्थानिकांना ७० टक्के रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, अशा घोषणा करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात सात वर्षानंतरही या कारखान्यातून एकही बोगी बाहेर पडलेली नाही किंवा स्थानिकांना रोजगार मिळालेला नाही. सध्या हा कारखाना पांढरा हत्ती बनून उभा आहे. नवीन वर्षात देखील या कारखान्यातून बोगी तयार होण्याची शक्यता धूसर आहे.
मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्यासाठी ३१ मार्च २०१८ ला तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कारखान्याचे भूमिपूजन झाले होते. एक वर्षाच्या आत हा कारखाना उभारून बोगी तयार करण्यात येतील, अशा घोषणा या नेत्यांनी केल्या होत्या.
या कारखान्यातून पहिल्या टप्प्यात वर्षाला २५० व दुसऱ्या टप्प्यात ४०० बोगी तयार होणार होत्या. त्यानंतर मेट्रोच्या वातानुकूलित बोगी तयार होतील, असे जाहीर झाले होते. त्यानंतर २०२२ मध्ये वंदे भारत रेल्वेच्या तीन हजार दोनशे बोगी तयार करण्याचे टेंडर काढण्यात आले.
२०२३ मध्ये १२० वंदे भारत रेल्वेच्या एक हजार ९२० बोगी उत्पादित करण्याचा निर्णय झाला. रेल्वे विकास निगम लिमिटेड आणि रशियाच्या सीजेएससी ट्रान्समास कॅसोर्टियम या दोन कंपन्यांतर्फे संयुक्तपणे या बोगी तयार केल्या जाणार असल्याचे जाहीर झाले. त्यामुळे नेमक्या कोणत्या रेल्वेच्या किती व कधी बोगी तयार होणार याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे.
निवडणूका पाहून उद्घाटन
हा कारखाना अपूर्णावस्थेत असताना, एकही बोगी तयार होण्याची क्षमता नसता केवळ लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कारखान्याचे उदघाटन करण्यात आले. १२ मार्च २०२४ ला राज्यातील रेल्वेच्या ८५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन झाले होते. त्यात या कारखान्याचा समावेश होता. हे उद्घाटन होऊन एक वर्ष झाले तरी कारखाना सुरु झाला नाही.
२०२५ मध्येही बोगी निर्मिती अशक्य
या कारखान्यावर केंद्र सरकारने कोट्यवधींचा खर्च केला आहे. गेल्या सात वर्षांत बोगी कशी तयार करायची, याचेच काम सुरू आहे. सध्या वंदे भारत रेल्वेच्या प्रायोगिक बोगी तयार करण्याचे काम कारखान्यात सुरु आहे. ते पूर्ण होण्यास दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने पुढे बोगी तयार होतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे २०२५ मध्ये तरी बोगी तयार होण्याची शक्यता धूसर आहे.