Sambhajinagar : ठेकेदाराचा हलगर्जीपणा; चौकात ड्रेनेजचे पाणी
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जवाहरनगर पोलिस स्टेशन ते टिळकनगर रस्त्यावरील चेतकघोडा चौकात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर साचले आहे. तेथील खड्ड्यांना तळ्याचे रूप आले आहे. आधी शहर तापाने फणफणलेले असताना त्यात सर्दी-खोकल्याच्या रूग्णात रोज वाढ होत असून, कोरोना रूग्ण देखील आढळून येत आहे. शहरात साथरोगाची लागण पसरत असताना अशाप्रकारे चौकात ड्रेनेजचे पाणी साचल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सांडपाण्यातून वाट काढावी लागणार असेल तर या चौकातून जायचेच कशाला? असा संतप्त सवाल वाहनधारकातून उपस्थित केला जात आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्त्याचे काम करणाऱ्या ए.जी. कन्स्ट्रक्शन कंपनीचा ठेकेदार असलम राजस्थानी याच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा करणारे भूमिगत पाइप टाकताना चेंबरलाइन फोडून टाकली. दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून ड्रेनेजचे चेंबर तुंबले असून त्यामधून एखाद्या ओढ्यासारखे पाणी वाहत आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी संपूर्ण चौकात पसरले असून खड्ड्यात जाऊन चौकाला तळ्याचे रूप आले आहे. संपूर्ण चौक ड्रेनेजच्या पाण्याने व्यापून टाकला असल्याने नागरिकांना चालायचे कसे? वाहन काढायचे कसे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. ड्रेनेजचे पाणी चौकात साचलेले असतानाच अवकाळी पावसाची भर पडली असून पावसाचेही पाणी मोठ्या प्रमाणावर चौकात साचले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणआत दुर्गंधी तर परसरलीच आहे. शिवाय, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाला आहे.
चेतकघोडा चौकातील एका चेंबरमधून पाणी वर येऊन त्यामधून संडासाची घाणही येते आणि ती चौकात साचते. याकडे महापालिका प्रशासनातील ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता भागवत फड, स्मार्ट सिटीचा प्रकल्प व्यवस्थापक इम्रानखान व अतिरिक्त मुख्याधिकारी अरूण शिंदे उप मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे देखील संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मागील तीन ते चार महिन्यांपासून हा त्रास सुरु असल्याचे स्थानिक रहिवाशी सांगत आहेत.
स्मार्ट सिटी कार्पोरेशनमार्फत शहरात स्मार्ट रस्ते बांधकामाचा प्रकल्पाचे काम सुरू आहे. दरम्यान चेतकघोडा चौकाचा आकार हा बशीसारखा आहे. येथे पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी ठेकेदाराकडून मोठ्या व्यासाचे पाईप टाकण्याचे काम करण्यात आले आहे. परंतु, रस्त्यांच्या बाजूला छोट्या व्यासाची व मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन आहे. ठेकेदार आणि स्मार्ट सिटी प्रशासनाने कुठलाही विचार न करता जेसीबीने खोदकाम करताना दोन्ही लाइन फोडून टाकल्या आहेत. यात महापालिकेचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या या प्रतापामुळे चौकालगत राहणाऱ्या नागरिकांसह दररोज लाखो वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालून प्रश्न सोडविण्याची गरज आहे.