
मुंबई (Mumbai) : कित्येक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक पवित्र्यात आहे. येत्या बुधवारपासून २३ ते ३० ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर मनसेने पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघणार आहे.
अलीकडेच पनवेल येथे झालेल्या निर्धार मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विविध प्रकारच्या आंदोलनातून मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा लावून धरण्याचे आदेश दिले होते. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर टीकाही त्यांनी केली होती. राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर मनसे खड्ड्यांच्या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा तीन टप्प्यात आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या दोन टप्प्यात चालत ही पदयात्रा निघणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात मनससेकडून गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.
यासंदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रात रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. विशेषतः मुंबई-गोवा महामार्गावर असंख्य खड्डे आहेत. या रस्त्यावर आतापर्यंत अनेक मृत्यू झाले आहेत. याबद्दल सरकार खंत व्यक्त करत नाही. सरकार गणपतीपर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे आम्ही ही जागर यात्रा काढणार आहोत. या यात्रेचा पहिला टप्पा हा पळस्पे ते माणगाव असा असणार आहे. तर या यात्रेचा दुसरा टप्पा हा भरणी नाका ते राजापूर असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली आहे. यावेळी कोकणातल्या नागरिकांना यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या यात्रेत मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.