मुंबई (Mumbai): मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (Expressway) अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि नव्याने सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते आणि प्रसिद्ध वास्तुविशारद (आर्किटेक्ट) अनंत गाडगीळ यांनी या प्रकल्पाला अत्यंत 'धोकादायक' म्हटले आहे. या प्रकल्पाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी संपूर्ण बांधकामाचे आणि झालेल्या अवाढव्य खर्चाचे त्रयस्थ (थर्ड पार्टी) संस्थेमार्फत ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी महायुती सरकारने घाईघाईने सुरू केलेला 'मिसिंग लिंक' रस्ते प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकत्याच झालेल्या पावसानंतर सोशल मीडियावर बोगद्यांच्या अंतर्गत परिस्थितीचे समोर आलेले फोटो आणि प्रवाशांमधील भीती यावर काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व आर्किटेक्ट अनंत गाडगीळ यांनी राज्य सरकारच्या कारभारावर आणि प्रकल्पाच्या दर्जावर सडकून टीका केली आहे.
काँक्रीट लायनिंगच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
अनंत गाडगीळ यांनी स्पष्ट केले की, डोंगराळ भागात रस्त्यासाठी किंवा बोगद्यासाठी खोदकाम केल्यानंतर त्याच्या अंतर्गत भागाला मजबुती देण्यासाठी जाड काँक्रीटचे लायनिंग (Lining) करणे अत्यंत गरजेचे असते. हे लायनिंग जर चुकीचे किंवा निकृष्ट दर्जाचे झाले, तर पावसाळ्यात डोंगरामधून झिरपणाऱ्या पाण्याचा जोर आणि दाब वाढल्यास काँक्रीटचे हे लायनिंग निकामी ठरू शकते. सध्या सोशल मीडियावर समोर येत असलेल्या फोटो आणि व्हिडिओंवरून ही बाब स्पष्टपणे दिसून येत असून, बोगद्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत.
युरोपियन मानकांकडे दुर्लक्ष आणि घिसाडघाईने उद्घाटन
परदेशात, विशेषतः युरोपियन मानकांप्रमाणे (European Standards) असा मोठा बोगदा किंवा मार्ग तयार केल्यावर किमान १० ते १२ महिने त्याची कडक चाचणी घेतली जाते. यादरम्यान समोर येणाऱ्या तांत्रिक उणिवा व त्रुटी दुरुस्त केल्या जातात आणि त्यानंतरच तो मार्ग जनतेसाठी खुला केला जातो.
मात्र, राज्यातील युती सरकारने केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी व प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अतिशय घाईघाईने या प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्यामुळे बांधकाम सुरक्षिततेच्या बाबींचे आवश्यक ते सर्वेक्षण न झाल्यामुळेच आज ही भीतीदायक परिस्थिती उद्भवली आहे, असा थेट आरोप गाडगीळ यांनी केला. प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना असून, मुंबई-पुणे मार्गावर नियमित धावणारे अनेक टॅक्सीचालक 'मिसिंग लिंक'चा वापर करण्यास घाबरत असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण ९ ते १० किलोमीटरच्या बोगद्यात नैसर्गिक हवा खेळती राहील (ओपनिंग) असा मार्ग निवडणे गरजेचे होते, अशी तांत्रिक सुधारणा त्यांनी सुचवली.
अवाढव्य खर्चाचा तपशील जाहीर करण्याची मागणी
"अवघ्या ९ ते १० किलोमीटरच्या या मार्गासाठी तब्बल १२ ते १३ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च आल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या लहान अंतरासाठी झालेला हा महाकाय खर्च पाहता यात जनतेच्या पैशांची मोठी लूट झाली आहे का, याबाबत की खरी वस्तुस्थिती जनतेसमोर येणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने या अवाढव्य खर्चाचा संपूर्ण तपशील जाहीर करावा आणि एका त्रयस्थ निष्पक्ष संस्थेमार्फत या संपूर्ण कामाचे तांत्रिक व आर्थिक ऑडिट करावे", अशी मागणी गाडगीळ यांनी केली.
मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर केलेल्या आपल्या पहिल्या प्रवासानंतर आपल्याला हा मार्ग धोकादायक वाटत असल्याची भीती आपण मंत्रालयातील पत्रकारांशी व्यक्त केली होती, असे सांगत गाडगीळ यांनी, "महाराष्ट्राला विकासाचे गुजरात मॉडेल नको," असा सणसणीत टोलाही महायुती सरकारला लगावला.
Key Points Summary
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने सुरू झाली 'मिसिंग लिंक' अत्यंत धोकादायक असल्याचा अनंत गाडगिळांचा दावा.
प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराचे आणि बांधकामाचे त्रयस्थ संस्थेमार्फत स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी.
बोगद्यातील काँक्रीट लायनिंग निकृष्ट दर्जाचे असल्याने पावसाळ्यात पाण्याचा दाब वाढून ते निकामी ठरण्याची भीती.
युरोपियन मानकांप्रमाणे १० ते १२ महिने चाचणी न घेता राजकीय श्रेयासाठी घाईघाईत उद्घाटन केल्याचा थेट आरोप.
अवघ्या ९ ते १० किमीच्या अंतरासाठी तब्बल १२ ते १३ हजार कोटी रुपयांच्या खर्चावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह; सविस्तर तांत्रिक तपशील जाहीर करण्याची मागणी.
असुरक्षिततेच्या भीतीपोटी नियमित प्रवास करणारे टॅक्सीचालक मिसिंग लिंकचा वापर टाळत असल्याचे केले स्पष्ट.
"विकासाचे गुजरात मॉडेल नको" म्हणत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा सरकारला सणसणीत टोला.