Vashi Bridge
Vashi Bridge Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai : मोठी बातमी! मुंबईच्या वेशीवरील वाहतूककोंडीला लवकरच पूर्ण विराम! 'हे' आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईच्या वेशीवर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी वाशीच्या खाडीवर (Vashi Bridge) उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या पुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. एल. अ‍ॅण्ड टी. कंपनी (L&T) या पुलाचे काम करत आहे. या प्रकल्पावर सुमारे 775 कोटी रुपयांचा खर्च होत आहे. आगामी तीन महिन्यात म्हणजेच जून २०२४ पर्यंत हा पूल बांधून पूर्ण होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीने (MSRDC) व्यक्त केला आहे.

अटल सेतू अर्थात एमटीएचएल खुला झाल्यामुळे नवी मुंबई आणि मुंबई या शहरांमधील अंतर मोठ्या फरकाने कमी झाले आहे. देशातील सर्वांत मोठा सागरी सेतू अशी ओळख असणाऱ्या अटल सेतूवरून सुरू होणारा प्रवास तुम्हाला अपेक्षित स्थळी किमान वेळात पोहोचवतो. अटल सेतूसोबतच आता मानखुर्द-वाशी खाडीपूलाचा मुंबई-नवी मुंबईचा टप्पा जून 2024 पर्यंत पूर्ण होणार असून, ठाण्याला जोडणारा हा संपूर्ण मार्ग नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे.

सायन-पनवेल महामार्गाचे विस्तारीकरण केल्यानंतर पनवेलपासून वाशीपर्यंतचा प्रवास सुसाट झाला आहे. त्यामुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत झाली. परंतु वाशी खाडीपुलावर रस्ता हा सहा पदरी असल्यामुळे मुंबईच्या वेशीवर वाहनांना वाहतुककोंडीचा सामना करावा लागत आहे. नव्या विस्तारीत पुलामुळे हा प्रश्न निकाली निघणार आहे.

या पुलामुळे सध्याच्या खाडी पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाशी खाडीवर सध्या दोन पूल कार्यरत आहेत. यापैकी जुन्या पुलावरून मुंबईहून येणाऱ्या हलक्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या खाडी पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनांना परवानगी आहे.

या पुलावर मुंबईकडे जाण्यासाठी व मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण सहा मार्गिका आहेत. परंतु मागील काही वर्षांत या पुलावरून वाहनांचा राबता वाढला आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून काही वर्षांपूर्वी तिसऱ्या पुलाच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आला होता. दोन भागांत हा तिसरा खाडीपूल उभारण्यात येत आहे.

सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या पुलाच्या रेल्वे पुलाकडील दिशेला एक आणि जुन्या खाडीपुलाकडील पहिल्या बाजूला एक असे तीन पदरी दोन पूल बांधण्यात येत आहेत. या दोन्ही पुलांची लांबी १८३७ मीटर तर रुंदी १२.७० मीटर इतकी असणार आहे. एल.अ‍ॅण्ड टी. कंपनी या पुलाचे काम करत आहे. या प्रकल्पावर एकूण 775 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. त्यापैकी सिडको आणि एमएसआरडीसी ही दोन्ही प्राधिकरणे प्रत्येकी 200 कोटी रुपयांचा खर्च उचलणार आहेत.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या बांधकामाविषयी सांगितले की, आतापर्यंत 73 टक्के काम पूर्ण झाले असून, मानखुर्द आणि वाशीदरम्यान बांधण्यात येणारा हा तीन मार्गिका असणारा पूल जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल. तर, वाशी ते मानखुर्दपर्यंतचा संपूर्ण टप्पा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले.

या संपूर्ण पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यास एकूण सहा लेन असणारा पूल दोन्ही दिशांची वाहतूक सुरळीत करण्यामध्ये आणि वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यात महत्त्वाचा ठरणार आहे. सध्याच्या घडीला वाशी खाडीपुलावरून दर दिवशी जवळपास दोन लाखांच्या जवळपास वाहने प्रवास करतात. ज्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होते.